राजगुरूनगर -मंदिरांइतकीच ज्ञानमंदिरेही सुसज्ज आणि भक्कम असली पाहिजेत. खेड तालुक्यात अनेक प्राथमिक शाळांचे निसर्गचक्री वादळात नुकसान झाले आहे. त्या सर्व शाळांची दुरुस्ती केली जाईल, जिल्हा परिषदेच्या माध्यमातून या शाळांना निधी आला आहे;मात्र तो अपुरा पडल्यास जादा निधी मिळवून दिला जाईल, असे प्रतिपादन आमदार दिलीप मोहिते पाटील यांनी केले.
धामणे येथील शाळेच्या नियोजित इमारतीचे भूमिपूजन आमदार दिलीप मोहिते पाटील, जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा निर्मला पानसरे यांच्या हस्ते नुकतेच झाले, त्यावेळी मोहिते पाटील बोलत होते. यावेळी पंचायत समितीच्या उपसभापती ज्योती अरगडे, कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती रमेश राळे, जयसिंग दरेकर, समीर राळे, कैलास बोर्हाडे, अंकुश कोळेकर, रोहिदास रामाणे, सुरेश कानडे, बाळासाहेब वाजे, मिलिंद येवला, धामण्याचे सरपंच महेंद्र कोळेकर, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष संगिता कोळेकर, ग्रामसेवक जय बांबळे, मुख्याध्यापक धर्मराज पवळे आदी मान्यवर उपस्थित होते.
निसर्ग चक्रिवादळामध्ये नुकसान झालेल्या धामणे शाळेची उपमुख्यमंत्री अजित पवार व इतर मान्यवरांनी भेट देत पाहणी केली होती. त्यावेळी पत्र्याच्या छताऐवजी आरसीसी स्लॅबचीच इमारत असायला हवी, अशी मागणी जि. प. अध्यक्ष पानसरे, आमदार मोहिते यांनी अजित पवार यांच्याकडे केली होती. दरम्यान, निसर्ग चक्री वादळात नुकसान झालेल्या शाळांना जिल्हा परिषदेच्या माध्यमातून निधी उपलब्ध करून देण्यात आला असून धामणे शाळेला 14.62 लाख रुपये निधी मंजूर झाला आहे. हा निधी अपुरा असल्याने येथे सुसज्ज इमारत व्हावी, यासाठी उर्वरीत निधीची तरतूद आमदार दिलीप मोहितेपाटील यांच्या प्रयत्नातून केली जाणार आहे.