हभप प्रशांत महाराज मोरे देहुकर
आंत अग्निज्योतीचा प्रकाशु । बाहेरी शुक्लपक्षु आणि दिवसु । आणि सामासांमाजीं मासु । उत्तरायण ।।220।।ऐशिया समयोगाची निरुती । लाहोनि जे देह ठेविती । ते ब्रह्मचि होती । ब्रह्मविद ।।221।। अवधारीं गा धनुर्धरा । येथवरी सामर्थ्य यया अवसरा । तेवींचि हा उजू मार्ग स्वपुरा । यावयां पैं ।।222।। (अध्याय 8 वा)
ध्यानयोगाच्या मार्गाने ब्रह्मस्वरूप होण्यासाठी किंवा मोक्ष प्राप्त करण्यासाठी अंतसमयी देह प्रयाणाचे वेळी शुद्ध काळ कसा असावा? या संबंधी संत ज्ञानेश्वर माऊली येथे प्रतिपादन करतात. देह प्रयाणाच्या वेळी देहाच्या आत जठराग्नीचा आणि बुद्धीच्या आत ज्ञानाचा प्रकाश असावा, आणि बाहेर शुक्ल पक्षातील चंद्राचा वाढत जाणारा प्रकाश असावा.
तसेच सूर्यामुळे प्रकाशमान दिवस असावा. त्याचबरोबर उत्तरायणातील सहा महिन्यांपैकी कोणताही एक महिना असावा. अशा प्रकारे सर्व चांगले योग जुळून आल्याची खात्री करून घेऊन जे योगी आपला देह त्याग करतात,
ते ब्रह्मानुसंधान करणारे ध्यानयोगी ब्रह्मरूप होतात. या काळाचे इतके सामर्थ्य आहे. तसेच निजधामाला अथवा ब्रह्म स्वरूपाला किंवा मोक्षाला जाण्याकरता हा सरळ मार्ग आहे, असे माऊली योगी पुरुषाला मार्गदर्शनपर भाष्य करतात.