पालकमंत्री धनंजय मुंडे यांचे निर्देश
बीड : शेतकऱ्यांना यावेळी प्राधान्याने कर्जवाटप केले जावे. तसेच सूचनांप्रमाणे कर्जवाटप न केल्यास बँकांवर गुन्हे दाखल करण्यात येतील असे प्रतिपादन पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी केले. राज्यात बीड जिल्ह्यातील शेतकऱ्यांना सर्वात जास्त प्रमाणात कर्जमाफी मिळालेली आहे. आता नव्याने पीक कर्ज वाटप करण्यासाठी बँकांनी सज्ज व्हावे आणि कुठलीही दिरंगाई न करता स्केल आॅफ फायनान्स (scale of finance) प्रमाणे कर्ज रक्क्म मंजूर करून तात्काळ कर्जाची रक्कम अदा करावी.
बॅंकांनी दर आठवड्यातील बुधवारचा संपूर्ण दिवस फक्त नव्याने पीक कर्ज अर्ज स्वीकारावे असे सांगून बँकांकडून शेतकऱ्यांना इतर कर्जांचे नाहरकत प्रमाणपत्र, कागदपत्रांची मागणी करण्यात येते. त्यामुळे शेतकऱ्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. याबाबत पालकमंत्री मुंडे यांनी नाराजी व्यक्त केली. यावेळी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक आणि विविध बॅक आणि शासकीय विभागांचे अधिकारी उपस्थित होते.
जिल्हाधिकारी कार्यालय बीड येथे आढावा बैठक प्रसंगी ते बोलत होते. यावेळी आ. प्रकाश सोळुंके, आ. संदीप क्षीरसागर, जिल्ह्याधिकारी राहुल रेखावार, जिल्हा पोलीस अधीक्षक हर्ष पोद्दार, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अजित कुंभार जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. अशोक थोरात, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. आर.बी. पवार आदी शासकीय अधिकारी यावेळी उपस्थित होते.