मानवाच्या मूलभूत गरजा म्हटले की अन्न, वस्र आणि निवारा या तीन गरजा आपल्याला माहीत आहेत. किंबहुना शालेय जीवनात अश्मयुगीन मानवाचा इतिहास शिकताना या गरजा आपल्या मनःपटलावर कोरल्या गेल्या. मात्र आपण जसजसे मोठे होत जातो तसतशी आपली मूलभूत गरजांची व्याख्या बदलत जाते. आदिमानव ते आजचा प्रगत मानव असा विकास जसजसा झाला तशा गरजाही वाढत गेल्या. भौतिक गरजांबरोबरच मानवाच्या मानसिक, भावनिक, शारीरिक आणि सामाजिक गरजाही असतात.
खरं तर या गरजा कधीही संपत नाहीत. बदलत्या कालानुरूप गरजाही बदलत जातात. या गरजांची व्याप्ती वाढत जाते. याच गरजांना पुढे अपेक्षेची किनार भेटते आणि मग सुरू होतो कधीही न संपणारा वाढत्या अपेक्षांचा पाढा. अनेकदा माणसांच्या अपेक्षा या गरजेतून नाही तर स्व,स्वार्थ, हव्यास आणि लोभ यातून निर्माण होतात. चटणी भाकरीपासून सुरू झालेल्या या गरजा पोळीभाजी, गोडधोड, मांसाहार यापासून ते फास्टफूडपर्यंत वाढत जातात आणि वाढलेल्या याच अपेक्षा आपण जगण्यासाठी खातो की खाण्यासाठी जगतो यावरच प्रश्नचिन्ह निर्माण करतात.
एकदा एक व्यक्ती आपल्या गुरूंकडे गेली आणि म्हणाली, “गुरुवर्य माझ्याकडे सर्वकाही आहे. मात्र असे असूनही मला असुरक्षित वाटते. मी समाधानी नाही असे का?’ गुरू त्याला घेऊन बाजारात जातात. बाजारात फिरताना ते त्याला काही वस्तू घ्यायला सांगतात. त्यात एक पुष्पगुच्छ आणि तो ठेवण्यासाठी एक आकर्षक काचेची फुलदाणी घेतो. त्यानंतर गुरुजी त्याला त्या दोन्ही गोष्टी त्याच्या घरातील एका टेबलावर ठेवायला सांगतात. त्यानंतर उद्या तुला पुन्हा भेटायला येतो म्हणून निघून जातात. दुसऱ्या दिवशी ठरल्याप्रमाणे गुरू सकाळी त्याच्या घरी जातात. ती व्यक्ती गुरूंचे स्वागत आणि आदरातिथ्य करते आणि काही वेळाने पुन्हा गुरूंना विचारते, “गुरुवर्य आपण अद्यापही मला माझ्या प्रश्नाचे उत्तर दिले नाही.’
गुरुवर्य तो विषय टाळत त्याला विचारतात, “अरे! काल आणलेली फुलदाणी आणि फुले कशी दिसत आहेत?’
ती व्यक्ती उत्तर देते, “फुलदाणी छानच आहे; परंतु पुष्पगुच्छातील फुले मात्र कोमेजली आहेत.’
गुरू त्या टेबलाजवळ जातात आणि फुलदाणीला धक्का देतात. काचेची फुलदाणी खाली जमिनीवर पडून फुटून जाते. फुलदाणी फुटताच दुःखाचे भाव त्या व्यक्तीच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसू लागतात.
गुरू त्याला विचारतात, “काय रे काय झाले? तुझा चेहरा का उतरला?’ त्यावर चिंतेच्या स्वरात तो म्हणाला, “अहो कालच नवी आणलेली एवढी सुंदर फुलदाणी फुटली ना.’ त्यावर गुरू म्हणतात, “त्यात काय एवढे. फुलेपण कोमेजली होती ना?’ ती व्यक्ती म्हटली, “फुले तर शिळी झाल्यावर कोमेजणारच होती. परंतु फुलदाणी अजून बरेच दिवस टिकली असती.’ गुरू हसतात आणि त्याला म्हणतात, “हेच तर आहे तुझ्या प्रश्नाचे उत्तर. पुष्पगुच्छ सुकणार हे तुला माहिती होते; परंतु फुलदाणी एवढ्या लवकर फुटेल याची तू अपेक्षाच केली नव्हती. त्यामुळेच वाढलेल्या/ठेवलेल्या अपेक्षेनेच तुला दुःख दिले. ज्याच्याकडून जितक्या अपेक्षा त्याच्याकडून तितकेच दुःख वाट्याला येणार. याउलट ज्याच्याकडून अपेक्षा कमी त्याच्याकडून फारसे दुःख होणार नाही. वाढत्या अवास्तव अपेक्षा हे तुझ्या दुःखाचे मूळ कारण आहे. त्यामुळे तू असमाधानी आणि मानसिकदृष्ट्या असुरक्षित आहेस. त्या व्यक्तीला आपली चूक लक्षात आली.
बरेचदा आपण समोरच्या व्यक्तीकडून अवास्तव अपेक्षा ठेवतो. या अपेक्षा जरा जास्तच आहेत असं आपलं मन मानायलाच तयार होत नाही. यामुळे त्या व्यक्ती किंवा वस्तूने आपल्या मनातली एखादी इच्छा वा अपेक्षा पूर्ण केली नाही, तर आपल्याला राग येतो, दुःख होते. वाढत्या अपेक्षा हेच माणसाच्या दुःखाचे, अपयशाचे, नात्यांतील कटुतेचे आणि वादविवादाचे मूळ आहे.
अगदी पैशाबद्दल ठेवलेल्या अनावश्यक अपेक्षा त्रासदायक ठरतात. अशावेळी लक्षात ठेवावे की भूक लागली म्हणून भाकरीऐवजी पैसा खाता येत नाही आणि पैसा जास्त आहे म्हणून भूकेपेक्षा जास्त अन्नही खाता येत नाही! म्हणजेच जीवनात प्रत्येक गोष्टीला ठराविक मर्यादा आहे आणि याची जाणीव आपल्याला व्हायला हवी. वाढत्या अनावश्यक व अवास्तव अपेक्षा टाळता आल्या तर सुखाची व्याख्या नक्कीच समजेल.
सागर ननावरे