सातारा -सातारा जिल्हा राष्ट्रवादी कॉंग्रेसचा बालेकिल्ला असून तो बालेकिल्लाच राहिला पाहिजे, यासाठी गटतट विसरुन राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्ष बळकट करा, असे आवाहन विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांनी केले. राष्ट्रवादी अभिप्राय अभियानात सातारा जिल्हा राज्यात पाचव्या क्रमांकावर असून तो पहिल्या क्रमांकावर येण्यासाठी पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी प्रयत्न करण्याचे आवाहन त्यांनी केले.
राष्ट्रवादी अभिप्राय अभियानाबाबत पक्षाच्या कार्यालयातील बैठकीत रामराजे बोलत होते. यावेळी पालकमंत्री बाळासाहेब पाटील, खासदार श्रीनिवास पाटील, आमदार शशिकांत शिंदे, मकरंद पाटील व दीपक चव्हाण, जिल्हाध्यक्ष सुनील माने, प्रभाकर घार्गे, प्रभाकर देशमुख, जिल्हा परिषदेचे अध्यक्ष उदय कबुले, उपाध्यक्ष प्रदीप विधाते, सभापती मानसिंगराव जगदाळे, मंगेश धुमाळ व सौ. सोनाली पोळ, दीपक पवार, देवराज पाटील, दत्तानाना धमाळ, बाबुराव सपकाळ, समिंद्रा जाधव, जयश्री पाटील, कविता म्हेत्रे, राजाभाऊ उंडाळकर, सतीश चव्हाण, भास्कर कदम, मिलिंद नेवसे, राजकुमार पाटील, शफीक शेख, तेजस शिंदे, अतुल शिंदे, बाळासाहेब सोळसकर, युवराज सूर्यवंशी, बाळासाहेब सावंत, दत्तात्रय साळुंखे, राजाभाऊ लावंघरे, मारुती इदाटे, निवास शिंदे,गोरखनाथ नलावडे, प्रसन्न बाबर, राजेंद्र कचरे आदी उपस्थित होते.
रामराजे म्हणाले, “राज्यात महाविकास आघाडी सरकारच्या माध्यमातून करोनासारख्या संकटाच्या काळातही जनतेला आधार देण्याचे काम होत आहे. सरकार कुठेही कमी पडत नाही. सरकार राबवत असलेल्या उपाययोजना तळागाळातील जनतेला समजाव्यात यासाठी राष्ट्रवादीच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी प्रयत्न करावेत.
राष्ट्रवादी अभिप्राय अभियानात जिल्हा राज्यात पाचव्या क्रमांकावर आहे. कोरेगाव विधानसभा मतदारसंघ राज्यात चौथ्या आणि फलटण विधानसभा मतदारसंघ राज्यात सहाव्या क्रमांकावर आहे. पक्षाचे काम निश्चित चांगले आहे. मात्र, त्यात आणखी सुधारणा करुन जिल्हा राज्यात पहिल्या क्रमांकावर आला पाहिजे. अभिप्राय नोंदवण्यासाठी दि. 25 जूनपर्यंत रात्री 10 वाजेपर्यंत मुदत आहे.” विधानसभानिहाय बुथ अध्यक्ष आणि बुथ सदस्य असून त्यांच्याकडे त्या त्या ग्रुपचे काम देणे गरजेचे आहे.
जिल्हा परिषद व पंचायत समिती सदस्यांना त्यांच्या गट व गणनिहाय जबाबदारी देऊन ते सर्व काम जिल्हा परिषद पदाधिकाऱ्यांकडे सोपवण्यात यावे, असे श्रीनिवास पाटील यांनी सांगितले. शहरी भागातील नगरसेवकांकडे अभिप्राय अभियानाची वार्डनिहाय जबाबदारी देण्यात यावी. जिल्ह्यातील पक्षाच्या सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांचे पदाधिकारी, सदस्य यांच्यावरही जबाबदारी देऊन जिल्हा राज्यात आघाडीवर राहील असे काम करण्याचे आवाहन बाळासाहेब पाटील यांनी केले. यावेळी अनेक मान्यवरांनी मनोगत व्यक्त केले.