कराड – कराड शहरात वाहतूक पोलिसांची कारवाई नेहमीच संशयास्पद राहिली आहे. याला शुक्रवारी दुजोरा मिळाला. येथील प्रशासकीय इमारतीच्या समोरील वनवे मार्गावर रस्त्याच्या मध्यावर असणाऱ्या चारचाकी वाहनांना वगळून येथील रस्त्याच्याकडेला असणाऱ्या दुचाकींवर कारवाई करत त्या उचलून नेल्या. त्यामुळे नागरिकांतून संताप व्यक्त होत आहे.
कराड शहरात वाहतूक कोंडीचा प्रश्न नेहमीच ऐरणीवर आलेला पहावयास मिळाला आहे. कोल्हापूर नाका, पोपटभाई पेट्रोल पंप, भेदाचौक, विजय दिवस चौक, कृष्णा नाका, कार्वे नाका यासह शहरातील मुख्य बाजारपेठेत वाहतुकीची कोंडी नित्याचीच बाब आहे. गेल्या तीन ते चार महिन्यात करोना लॉकडाऊनच्या पार्श्वभूमीवर मुळात शहरात वाहतूक नसल्याने शहरातील रस्ते महाकाय व शांत दिसून येत होते. त्यामुळे वाहतूक पोलिसांवर महत्वाच्या चेकपोस्ट व्यतिरिक्त शहरातील नियमबहाय्य पार्किंग करण्यात आलेल्या दुचाकी, तीनचाकी अथवा चारचाकी कार तसेच ट्रक आदी वाहनांवर कारवाई करण्याचा प्रश्नच आला नाही.
मात्र, लॉकडाऊन शिथील झाल्यानंतर शहर हळूहळू मूळपदावर येत आहे. सकाळी 9 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत संपूर्ण बाजारपेठ खुली करण्यात आल्याने शहरी भागासह ग्रामीण भागातील लोक शहरात दाखल होत आहेत. त्यामुळे शहरातील वर्दळ वाढली आहे. दवाखाने, धान्याची दुकाने, फळ व भाजीपाला होलसेल व रिटेल मार्केट, कापड, मेडिकल आदी सर्व काही सुरू झाल्याने शहरात गर्दी आहे. याशिवाय शासकीय कार्यालयेही सुरू झाली आहेत.
गेल्या तीन महिन्यांपासून प्रलंबित असलेली प्रशासकीय कामे करण्यासाठी ग्रामीण भागातील नागरिक येथील पंचायत समिती व नवीन प्रशासकीय इमारतीत दाखल होत आहेत. त्यामुळे या परिसरातून जाणाऱ्या वनवे मार्गावर नागरिक जागा मिळेल. त्याठिकाणी आपली वाहने उभी करत आहेत. त्यामुळे पार्किंगचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.
येथील वाहतूक कोंडीचा प्रश्न लक्षात घेऊन जागे झालेल्या वाहतूक पोलिसांनी शुक्रवारी कारवाईला सुरूवात केली. मात्र, पंचायत समिती व नवीन प्रशासकीय इमारतीच्या समोर रस्त्याच्या मध्यावर पार्किंग करण्यात आलेल्या चार चाकी गाड्यांना कारवाईतून वगळण्यात आले. वास्तविक पाहता येथे रस्त्याच्या मध्यावर असलेल्या चारचाकींवर कारवाई होणे अपेक्षित होते. परंतु, वाहतूक पोलिसांनी रस्त्याला मारलेल्या पांढऱ्या पट्टयाच्या बाहेर असलेल्या दुचाकी वाहनांवर कारवाई केली. आणि बड्यांच्या चारचाकी वाहनांना सवलत दिल्याचे दिसून आले. त्यामुळे नागरिकांमध्ये याबाबत उलटसुलट चर्चा सुरू होती.