नवी दिल्ली : ८ डिसेंबर रोजी झालेल्या हेलिकॉप्टर अपघातात ग्रुप कॅप्टन वरुण सिंग एकमेव बचावले आहेत. त्यांची सध्या प्रकृती चिंताजनक असली तरी स्थिर असल्याचे भारतीय हवाई दलाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. या घटनेत चिफ ऑफ डिफेन्स बिपिन रावत, त्यांच्या पत्नी मधुलिका रावत आणि इतर ११ जणांनी तामिळनाडूच्या कुन्नूरमध्ये प्राण गमावले आहेत.
ग्रुप कॅप्टन सिंग यांच्यावर बेंगळुरू येथील कमांड हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत. “वरुणच्या तब्येतीत चढ-उतार होत आहेत, परंतु एक सैनिक असल्याने तो ही लढाई जिंकेल, असा मला विश्वास आहे,” असे भोपाळ येथे राहणारे त्यांचे निवृत्त वडील कर्नल केपी सिंग यांनी म्हटले आहे.
“सर्वोत्तम वैद्यकीय सुविधा, उत्तम तज्ज्ञ त्याच्यावर उपचार करत आहेत. संपूर्ण देश त्याच्यासाठी प्रार्थना करत आहे. त्याला ओळखत नसलेले किंवा सेवानिवृत्त झालेले किंवा सेवा देणारे बरेच लोक भेटायला आले आहेत.
अनेक महिला देखील त्याला भेटायला येत आहेत, हे सर्व पाहून मी भावूक झालो आहे. त्यांना वरुणला भेटायचे आहे. त्याला लोकांचे प्रेम आणि आपुलकी मिळत आहे. तो एक सैनिक आहे आणि तो लवकरच ही लढाई जिंकून बाहेर येईल,” असे केपी सिंग म्हणाले.
दरम्यान, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनीही कर्नल के.पी.सिंह यांच्याशी बातचीत केली असून ते त्यांच्या कुटुंबाच्या संपर्कात आहेत.