एखाद्या गुळगुळीत पृष्ठभागावरून एखादी वस्तू किती सहजपणे घरगळून जाते ना तसेच माझ्या मनाचे झाले. कुठे म्हणून अडथळा नाही. प्रेमात पडले म्हणजे नेमके काय घडलं. कशावर प्रेम जडले, आताशा कळेनासे झाले. माणसाच्या दिसण्यावर की त्याच्या बुद्धीवर? अंतरंग तर समजत नाही. ते रंग बरेच असतात. सुंदर दिसणारे रंग कधी गहिरे होतात, तर कधी एकमेकांत इतकी मिसळतात की, रंग ओळखायला शिकलं पाहिजे. तसं पाहिले तर हल्ली हल्ली मला स्वत:शीच बोलायला आवडतं, कारण शेवटी मन तर आपलंच असतं. आपला अधिकार असतो बाकी कुठे?
मला असं वाटत आहे, सारी दुःख मला स्पर्श करून जात आहेत. हरवलेली मी आणि तुटलेलं माझं मन, त्यातच सुटत चाललेला धीर आणि संपत जाणाऱ्या आशा. कोणाजवळ व्यक्त करणार दुःख, आता तर सगळेच पाठ फिरवून आहेत.
खरं तर त्याच्या मित्रात एवढा का जीव गुंतला कळत नाही. नवऱ्याबरोबर तर खूप आयुष्य घालवलं, बरं वाईट पण आता… समजत नाही की जाणूनबुजून परत जुन्या गाठोड्यापाशी फिरकायचं नाही. तसं पाहिलं तर दोघांमध्ये पण अडकली की श्वास पण माझा राहिला नाही. प्रत्येक क्षण अवघडतो. आठवणीत का व्हावं असं हे कोणालाच माहीत नाही.
ज्याच्यावर पहिल्यांदा प्रेम केले तो… की त्याचा मित्र तो पण… सगळे दिवस एकट्याने निभवायचे. तो गेला परत न येण्यासाठी. सगळं कसं वाघाने गिळल्यासारखेच वाटते.
चिकूची बी फळात राहूनही फळ पक्व झाले की त्यातून अलगद बाहेर पडते, अगदी स्वच्छपणे. आंब्याची कोय मात्र आंब्याच्या रसात इतकी गुरफटून जाते की फळ पिकलं तरी रसातून अलगद बाजूला होत नाही.
तिला लोक पूर्ण चोखल्याशिवाय सोडत नाही. म्हणून चिक्कूच्या बी सारखं वागावं. सगळ्या मोह जाळ्यात राहून योग्य वेळी करकरीत बाहेर पडता येते. आंब्याच्या कोयीसारखे मायारूपी रसात गुरफटून राहायचे असेल तर मात्र लोक पिळून चोथा करून फेकल्याशिवाय राहणार नाहीत.
नवरा तर म्हणायचा, “मी स्वतःही फार मोठी किंमत दिलेली आहे. तुला केवळ समर्थ पाहायची होती. खरंच तुला दिलेला एकटेपणा कठोर होता. माझ्या विलक्षण अनुभवात तुला सामील न करता मी खूपच पुढे निराळ्याच दिशेने गेलो. या शरीर भिंतीपार करताच येत नाहीत हे समजलं, तरी माझा द्वेष करू नकोस, मी नेहमीच तुझ्या प्रेमात आहे. तुझ्याशिवाय कोणाचा विचार केलेला नाही’.
खोट्या सामाजिक प्रतिष्ठेचं माझं वाटणं थांबलं. मन अस्वस्थ झालं. वाट्याला आलेलं हे साचलेलं कधी संपणार. मनातील व्यथा वेदना सांगायची तरी कुणाला. भेट होईल का नाही माझी आणि दुरवर माझी वाट पाहत थांबलेला तो. असंभव्यतेच्या दोन टोकावर दोघे उभे असून देखील भेटण्याची ती ओढ कायम आहे, दोघांच्याही मनात. अगदी पूर्वीसारखीच. तू कसा आहेस, विचारावसं नेहमी वाटे. पण तुझ्या न बोलण्यात सगळंच आलं.
आता तुझ्या मृत्यूची बातमी आली. खरे तर काहीच भयावह वाटले नाही. तळापासून काही ढवळून निघाले. तुझ्या श्वासाला स्वतःचे अस्तित्व उरलेले नव्हते. तेव्हाची गोष्ट आहे. माझ्यापासून तुझ्यापर्यंत आखलेल्या जाणिवांची साखळी अचानक विखरून उद्ध्वस्त होऊन गेली. फक्त ज्वलंत दुःख वाट्याला आले.
तू म्हणजे तुझे रूप, भावना, तुझ्याबरोबर घडलेले आणि अव्यक्त पातळीवर जाणवलेले संवाद, तुझे हसणे, रडणे, बोलणे, गाणे हे सगळं अनुभवणे. तुझा शब्द संवाद, तुझ्या आवडीची पुस्तके माझ्या परिघाशी जोडलं गेलेलं जगणं, भोगणं. तू आतापर्यंत काय करत होता, याची उत्तरे शोधत राहायची. आयुष्य पुढे जगायचे आणि त्यासाठी मागचे संदर्भ शोधायचे. जुन्या डगमगत्या खांबाची आपली पाळेमुळे मुद्दाम खोदून उकरून पाहायची. आयुष्यातील एक जीवन वजा झालं. आता हे सगळं स्वीकारलं तर आहेच पण आयुष्य अवघड आहे.
आता तर काय, मला माझी सोबत असेल. माझ्या अंतिम श्वासापर्यंत खरंच मी मला साथ देईल. अगदी शेवटपर्यंत तरळतील अश्रू पापण्यात. ते अश्रू पुसून स्वतःला हसवत राहील शेवटपर्यंत. मला माझी साथ द्यायला हवी.
माझी मी जबाबदारी पेलवेन का शेवटपर्यंत. एकच इच्छा आहे, आयुष्यरूपी रंगमंचावर जेव्हा माझ्या भूमिकेचा शेवट होईल तेव्हा माझ्या चेहऱ्यावर हास्य असावं. मी निरोप घेताना, मला निरोप देताना कोणी दुःखाचे मुखवटे चढून आलेले नसावे. ओघळणारे खोटे अश्रू नको आहेत. त्यापेक्षा हसरं मन असावं… (समाप्त)
– सुगंधा शिरवळकर