पेठ -सातगाव पठार (ता. आंबेगाव) भागात बटाटा लागवड कमी झाली असल्याने असंख्य शेतकऱ्यांनी भुईमूग पीक मोठ्या प्रमाणात घेतले आहे. अनेक शेतकऱ्यांना भुईमूग बी खराब लागल्यामुळे चाळीस ते पन्नास टक्के उगवण क्षमता झालीच नाही. ज्या शेतकऱ्यांनी घरगुती भुईमूग बी वापरले त्या शेतकऱ्यांचा भुईमूग हा चांगला आहे; पावसाने पाठ फिरवल्याने येथील शेतकरी हवालदिल झाले आहेत.
पाऊस नसल्याने उष्णता वाढली आहे. किडीचा प्रादुर्भाव भुईमूग पिकाला झाल्याने फवारणीची कामे सुरु झाली आहेत. गेले काही दिवसांपासून कडक ऊन वाढले आहे. जुलै महिना संपत आला तरी पावसाचा पत्ता नाही. शेतकरी वर्ग अत्यंत अडचणीत आला आहे. 220 रुपये प्रति किलो बाजारभावाने शेंगदाणा बियाणे घेऊन पेरणी केली आहे. खुरपणी करताना मजूर करोनामुळे कामाला येत नाहीत. फार दयनीय अवस्था शेतकरी वर्गाची झाली आहे.खते, औषधे महाग झाल्याने व जवळचा पैसा संपल्याने आता हातातोंडाशी आलेले बटाटा, भुईमूग, वाटाणा पीक उन्हापासून टिकाव धरू शकत नसल्याने पाऊस कधी पडतो, या एका आशेवर पिकांचे भवितव्य अवलंबून आहे.
येथील शेतकरी सुनील मोरडे, बाबु मोरडे, मंगेश रागमहाले, मारूती पवळे यांच्या शेतातील भुईमूग पीक जळण्याच्या स्थितीत आहे. गेले पंधरा दिवसांपासून पावसाने दिलेला प्रचंड ताण यामुळे बटाटा, भुईमूग, सोयाबीन, वाटाणा पिके संकटात आहे. काही शेतकऱ्यांनी तुषार सिंचन सुविधा केली असून खुरपणी अंतिम टप्प्यात आहे. पावसाळा असून सुद्धा दिवसभर ढगाळ वातावरण न राहता उन्हाळ्यासारखे कडक ऊन पडत आहे. परिणामी जमिनीतील ओलावा कमी होत चालला असून उत्पादन घटण्याची शक्यता जास्त असल्याचे शेतकरी सोपान नवले, भगवान चिकणे, शिवाजी चिकणे, महमूद पटेल या शेतकऱ्यांनी सांगितले.