“तू तलम अग्निची पात,
जशी दिनरात जळावी मंद…
तू बंधमुक्त स्वच्छंद,
जसा रानात झरा बेबंद…
मल्लिका अमरशेख यांच्या समर्थ लेखणीतून झरझर वाहणाऱ्या या शब्दमोत्यांची सर केवळ आणि केवळ पोलीस दलात आपल्या कार्यकर्तृत्वाने झळाळणाऱ्या अग्निशलाकांसाठीच असावी, असे म्हटल्यास अतिशयोक्ती ठरू नये! कारण घर आणि नोकरी अशा दोन्ही ठिकाणी कधी प्रेमाने तर कधी दंडुका उगारून प्रत्येक समस्या सोडविण्याची हातोटी केवळ एखादी महिलाच करू जाणे!
जिच्या हाती पाळण्याची दोरी, ती जग उद्धारी! आपल्याकडील ही खूप प्रचलित म्हण. ही म्हण खरी ठरवणाऱ्या असंख्य महिलांनी आपल्या कर्तृत्वाने समाजाच्या आणि देशाच्याही विकासात मोलाचे योगदान दिले आहे. आज असं एकही क्षेत्र नाही की जिथे महिलांनी आपलं कर्तृत्व सिद्ध केलं नसेल…अगदी खास पुरुषी समजल्या जाणाऱ्या क्षेत्रांतही त्या आत्मविश्वासाने वावरताना दिसतात. शिक्षण आणि त्यामुळे येणारी सजगता, स्वतःबद्दलच्या जाणिवा आणि नेणिवांनी आजची स्त्री खूपच बदलली आहे. जुन्या अनिष्ट चाली-रितींना तिलांजली देऊन नव्या बदलांना आपलेसे करीत, हरतऱ्हेचे आव्हान स्वीकारीत आणि मुख्य म्हणजे बाहेरचे करियर करताना घरातील जबाबदाऱ्याही तितक्याच समर्थपणे व प्रामाणिकपणे पेलणाऱ्या महिलांच्या कर्तृत्वाला खरंतर सलामच आहे!
“पोलीस’ या शब्दबरोबर येणारी भीती, दरारा आपण सारेच अनुभवतो. मात्र, बदलत्या प्रवाहानुसार आता पोलीस दलातही महिलांचे काम करण्याचे प्रमाण वाढत जाताना दिसते आहे. पाळण्याच्या दोरीची जागा आता पोलिसी दंडुक्याने घेतली आहे.
समाजात, राज्यात तसेच देशात सध्या असुरक्षितता वाढली आहे. लहान मुले, विविध वयोगटातील महिला, ज्येष्ठ नागरिक, कोणीही सुरक्षित नाहीत. महिला अत्याचारांच्या घटना वाढत आहेत. या पार्श्वभूमीवर महिला पोलिसांची भूमिका महत्त्वपूर्ण ठरत आहे. कारण त्या केवळ “महिला’ असणं हेच अनेक अत्याचारग्रस्त महिलांसाठी आश्वासक आणि दिलासादायक ठरत आहे. आपल्या तडफदार नेतृत्वाने प्रत्येक कामगिरी पार पाडणाऱ्या महिला पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या स्त्रीसुलभ संवेदनशील स्वभावामुळे केवळ तक्रारदारच नव्हे, तर गुन्हेगारांमध्येही आमूलाग्र बदल घडताना दिसत आहेत. आज महिला दिनानिमित्त अत्यंत आव्हानात्मक आणि खडतर असणाऱ्या “पोलीस दला’तील महिलांच्या कार्याची माहिती घेणं खूप रंजक ठरेल.
भारतीय पोलीस दलात पुरुषांच्या तुलनेत महिला पोलिसांची संख्या कमीच आहे. राज्याच्या गुन्हेगारीचा लेखाजोखा मांडणाऱ्या “क्राइम इन महाराष्ट्र 2016′ या अहवालानुसार राज्यात दोन लाख 14 हजार पोलीस अधिकारी आणि कर्मचारी मंजूर आहेत. मात्र, त्यापैकी दोन लाख चार हजार प्रत्यक्ष मनुष्यबळ कार्यरत आहेत. भौगोलिक क्षेत्रफळानुसार महाराष्ट्र देशातील तिसऱ्या क्रमांकाचे मोठे राज्य. असं असतानाही अन्य राज्यांच्या तुलनेत महाराष्ट्रातील पोलिसांची संख्या सर्वांत कमी आहे.
राज्यात पोलिसांचे मनुष्यबळ कमी असतानाच त्यामध्ये महिला पोलिसांचे प्रमाणही खूपच कमी आहे. महिला अत्याचाराच्या गुन्ह्यांचा तपास फक्त महिला अधिकाऱ्यांनीच करावा, असे निर्देश आहेत. मात्र, अनेक पोलीस ठाण्यात तपास करण्यासाठी बाहेरील पोलीस ठाण्यातून महिला अधिकारी बोलविण्याची वेळ येते. राज्यात सध्या एक लाख 78 हजार 419 पुरुष पोलीस, तर महिला अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचे संख्याबळ 26 हजार 236 आहे. यामध्ये 1 हजार 743 अधिकारी, तर 24 हजार 204 कर्मचारी आहेत. एका महिला अधिकाऱ्यामागे 14 महिला पोलीस कर्मचारी आहेत. पुणे शहरात आठ हजार 710 पुरुष पोलीस आहेत. तर, 2 हजार 108 महिला पोलीस आहेत.
भारतीय पोलीस दलात महिलांच्या प्रवेशामुळे सकारात्मक बदल झाले आहेत, याबाबत दुमत नसावे. उदाहरणच द्यायचे तर माजी आयपीएस अधिकारी किरण बेदी यांची तिहार तुरुंगातील करकिर्दीकडे पाहता येईल. करड्या आणि रुक्ष पोलीस दलाला समाजाभिमुख करण्याबरोबरच संवेदनशील करण्याचे मोठे श्रेय किरण बेदी यांना द्यावेच लागेल. तिहार तुरुंगाच्या कायापालट करताना त्यांनी कैद्यांना आत्मसन्मानाने जगण्याचा मार्ग दाखवला. कैदी तसेच तुरुंग कर्मचाऱ्यांना मानवी मूल्यांची शिकवण देत विपश्यना वर्ग सुरू केले. कैद्यांना मिळणाऱ्या सोयीसुविधा, कारागृहाची स्वच्छता या गोष्टींकडे जातीने लक्ष दिले. कैद्यांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आत्मसन्मानाने परतता यावे यासाठी व्यसनमुक्ती, प्रौढ शिक्षण, समुपदेशन यासारखे कार्यक्रम राबविले. यामुळे वैफल्यग्रस्त कैद्यांच्या मनाला जगण्याची नवी उमेद मिळाली.
किरण बेदी यांच्याबरोबरच अनेक महिला पोलीस अधिकाऱ्यांनी आपल्या धडाकेबाज कामगिरीने लक्ष वेधून घेतले आहे. महाराष्ट्रातील तरुणाईच्या “आयकॉन’ बनलेल्या मीरा बोरवणकर यांनीही मुंबईच्या गुन्हे शाखेचे प्रमुखपद समर्थरित्या सांभाळले आहे. तसेच पुण्याचे पोलीस आयुक्तपदही उत्तम पेलले. यादरम्यान त्यांनी केलेल्या धडाडीच्या कामगिरीची दखल बॉलिवूडने घेऊन “मर्दानी’ हा चित्रपटही काढला. विद्यार्थ्यांमध्ये पोलिसांविषयीची नकारात्मकता नाहीशी व्हावी तसेच पोलीस ठाण्यातील कामाचा खराखुरा अनुभव त्यांना मिळावा, यासाठी बोरवणकर यांनी पुण्यात राबविलेला “पोलीस विद्यार्थी’ हा उपक्रम ही चांगलाच गाजला.
काही वर्षांपूर्वी राज्यात गाजलेला जळगाव येथील लैंगिक अत्याचार प्रकरणात मीरा बोरवणकर यांनी घेतलेल्या करड्या भूमिकेमुळे आरोपी तर गजाआड झालेच, पण त्यांच्या स्त्रीसुलभ कौशल्यामुळे अनेक अत्याचारग्रस्त महिलांना समोर येऊन तक्रार देण्याचे बळ ही मिळाले. त्यानंतरच्या काळात असंख्य महिला आपल्यावरील अत्याचाराची तक्रार देण्यासाठी अत्यंत धाडसाने पोलीस ठाण्याची पायरी चालू लागल्या ही मीरा बोरवणकर यांच्या तडफदार कामगिरीची पावतीच म्हणावी लागेल. किरण बेदी आणि मीरा बोरवणकर यांच्यासारख्याच देशातील काही महिला पोलीस अधिकाऱ्यांच्या लखलखत्या कामगिरीने दाखल घ्यायला लावली आहे. संजुक्ता पराशर, रुवेदा सालम, अपराजिता राय, मारिन जोसेफ, सोनिया नारंग, सौम्या संभुशिवन, संगीता कालिया, श्रीदेवी गोयल, अर्चना त्यागी, विद्या कुलकर्णी, प्रज्ञा सरोदे, शोभा ओहटकर, अस्वती दोरजे, रश्मी करंदीकर या व अशा अनेक महिला पोलीस अधिकाऱ्यांनी धडाकेबाज कामगिरी केली आहे.
आपल्याला अभिमान वाटेल, अशी एक घटना नुकतीच घडली आहे. भारतीय लष्करातील डॉक्टर असलेल्या डॉ. माधुरी कानिटकर यांची 29 फेब्रुवारी रोजी लेफ्टनंट जनरल या पदावर नियुक्ती झाली आहे. या पदावर काम करणाऱ्या त्या तिसऱ्या महिला तर महाराष्ट्रातील पहिल्या महिला आहेत. त्यांनी नवी दिल्ली येथील एकात्मिक संरक्षण विभागाच्या उपप्रमुख (सीडीएस-वैद्यकीय) म्हणून पदभार स्वीकारला. त्यापूर्वी कानिटकर पुणे येथील आर्मड फोर्सेस मेडिकल कॉलेजच्या महिला अधिष्ठाता म्हणून कार्यरत होत्या. या पदावरील त्या पहिल्या महिला होत्या, हे विशेष!
महिलांचे पोलीस दलातील विविध विभागांमध्ये आत्मविश्वासाने वावरणे पाहून समस्त स्त्रीवर्ग अभिमानाने फुलून जातो. पुरुष पोलिसांप्रमाणेच महिला पोलीसही 12-12 तास उभे राहून “ड्युटी’ करतात, त्यांच्यासाठी बाहेर “फिल्ड’वर कसल्याही सोयी सुविधा नसताना सण-उत्सवाप्रसंगी तसेच मोर्चा, आंदोलने अशा ठिकाणी तासन्तास कर्तव्य बजावतात, तेव्हा त्यांच्या जिद्दीला सलाम करावासा वाटतो.
कुटुंबाला समर्थपणे सांभाळणाऱ्या महिला पोलीस दलातील कर्तव्यही तितक्याच समंजसपणे आणि संवेदनशीलपणे समाजातील अवघड प्रश्न सोडवू शकतात, सोडवतील याबाबत शंका नाही. मात्र, याद्वारे पुरुष पोलिसांच्या कर्तबगारीचे महत्त्व कमी होणार नाही. किंबहुना त्यांना कमी लेखायचेच नाहीये. पुरुष सहकाऱ्यांच्या बरोबरीने आव्हानात्मक आणि कठीण अशा कामगिरी चोख बजावणाऱ्या महिला पोलिसांची दखल घेतली जावी, अशी अपेक्षा आहे. महिला पोलिसांनी कर्तव्य बजावत असताना पुरुष सहकाऱ्यांनी समजून घेतले पाहिजे, त्यांना कमी न लेखता समानतेची वागणूक दिली पाहिजे. या महिला दिनी ही अपेक्षा पूर्ण होईल, अशी आशा समस्त महिला पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना आहे. महिला आपल्या शिक्षणाचा आणि अंगभूत कौशल्याचा पोलीस खात्यात प्रवेश करून उपयोग करू शकतात. यामुळेच सध्या महिला मोठ्या संख्येने पोलीस दलात दाखल होताना दिसतात. या महिला आपल्या कर्तृत्वाने पोलीस दलाचे नाव तर उंचावतीलच, पण समाजाची मानसिकताही बदलतील.
लेखांकन – श्री. भाऊसाहेब आनंदा काळोखे
अध्यक्ष – श्री घारजाई माता फळभाजी मंडई संघटना
संस्थापक – अध्यक्ष – मार्केटचा राजा गणेशोत्सव मंडळ