महिला क्रिकेटपटू पूनम यादवचे परखड मत
नवी दिल्ली – करोनामुळे सहन करावा लागलेल्या पाच महिन्यांच्या खंडांनंतर मैदानात उतरून सरस कामगिरी करणे म्हणजे रस्त्यावर मिळणारे इन्स्टंट फूड खाण्याइतकी सोपी गोष्ट नाही, असे परखड मत भारताची महिला क्रिकेटपटू पूनम यादव हिने व्यक्त केले आहे.
मार्च महिन्यापूर्वी विश्वकरंडक स्पर्धा झाली. त्यात विजेतेपद जरी मिळवता आले नाही तरीही संघाला सेकंड बेंच मिळाला. येत्या काळात हेच खेळाडू देशाला यश मिळवून देतील. त्यानंतर मात्र, जगभरात करोनाचा धोका वाढल्याने सर्व स्पर्धा ठप्प झाल्या. आता देखील या स्पर्धा कधी सुरू होतील हे कोणी सांगू शकत नाही, पण जेव्हा स्पर्धा सुरू होतील तेव्हा लगेचच सरस कामगिरी होईल, अशी अपेक्षा ठेवणे योग्य नाही. हा कालखंड सगळ्याच खेळाडूंसाठी निराशाजनक होता. यातून बाहेर पडून यश मिळविण्यासाठी अफाट मेहनत गरजेची आहे, असेही पूनमने सांगितले.
करोनामुळे जो खंड पडला त्यातून बाहेर येण्यासाठी तसेच आंतरराष्ट्रीय स्तरावर यशस्वी कामगिरी करण्यासाठी काही सराव सामने खेळणे अत्यंत महत्त्वाचे आहे. तसेच प्रत्यक्ष सामन्यांपूर्वी किमान दोन आठवड्यांचे सराव सत्र आयोजित केले गेले पाहिजे. यातून खेळाडूंना मैदानात उतरून भरपूर सराव करता येईल. तसेच आगामी काळात आपली तंदुरुस्ती टिकवून ठेवण्यासाठीही ते तयार राहतील, असे मतही पूनमने व्यक्त केले.
महिलांची आयपीएल केव्हा ?
आयपीएल स्पर्धा येत्या सप्टेंबरपासून सुरू होत आहे हे भारतीय क्रिकेटसाठी निश्चितच चांगले आहे. मात्र, आता पुरुषांच्या आयपीएलला तेरा वर्षं झाली, पण महिलांच्या स्पर्धेबाबत निर्णय कधी घेतला जाणार? जर महिलांची आयपीएल झाली तर भारताच्या महिला क्रिकेट संघाला नवी गुणवत्ता व सेकंड बेंच निश्चितच मिळेल, असेही पूनमने म्हटले आहे.