नवी दिल्ली – देशात करोना संसर्गाने थैमान घातलं आहे. आरोग्य सुविधांअभावी अनेकांना आपला प्राण गमवावा लागत आहे. अनेक ठिकाणी रक्ताचे नाती पाठ फिरवाताना दिसतात. तर काही ठिकाणी रक्ताची नातीच धावून येत असल्याचं चित्र आहे. तर डॉक्टर मंडळी जीवाची बाजी लावून रुग्णांना वाचविण्यासाठी लढा देत आहेत. त्यातच आता मन हेलावून टाकणारी घटना समोर आली आहे. याला ग्रेट लव्ह म्हणावं की, दुर्दैव हे सांगणंही कठीण झाला आहे.
चित्रपटात आपण अनेकदा पाहिलं की, नायक किंवा नायिकेचं निधन झाल्यानंतर त्यांचा साथीदारही आपला जीव सोडून देतो. अशीच काहीशी घटना मध्य प्रदेशात घडली आहे. येथे पत्नीच्या निधनानंतर विरह सहन न झाल्याने पतीने एका तासाच्या आत आपला प्राण सोडला. त्यामुळे कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे.
मध्यप्रदेशच्या ग्यारसपूर येथील मनोरा या गावात ही घटना घडली आहे. येथील एका 95 वर्षीय महिलेचा दीर्घ आजारामुळे मृत्यू झाला. पत्नीचा मृत्यू झाल्याचा धक्का सहन न झाल्याने एका तासातच पतीचा देखील मृत्यू झाला आहे. त्यामुळे कुटुंबीयांनी 100 वर्षीय प्रताप सिंह आणि त्यांच्या पत्नी प्रसादीबाई यांच्या मृतदेहाचे एकाच चितेवर अंत्यसंस्कार केले.
दरम्यान ९५ वर्षीय प्रसादीबाई यांच्या मृत्यूनंतर अंत्यसंस्काराची तयारी सुरू होती. मात्र एका तासाच्या आतच पती प्रतापसिंह यांनीही प्राण त्यागला. या जोडप्याचं एकमेकांवर असलेले प्रेम पाहून गावकरी देखील भावूक झाले होते.