देशात अभिव्यक्ती स्वातंत्र्याला मोठे महत्त्व आहे. ते असायलाही हवे. तुम्ही व्यक्त होणे अथवा तुम्हाला निर्भय वातावरणात व्यक्त होता येणे हे लोकशाहीचे गुणवैशिष्ट्य. जेथे असे होत नाही, तेथे लोकशाही नसते. ती एककल्ली व्यवस्था असते. अशा व्यवस्थेत कोणी एक व्यक्ती आणि तिचे सल्लागार मंडळ फक्त निर्णय घेऊ शकतात. इतरांनी त्याचे पालन करायचे असते किंवा केलेच पाहिजे असा दंडक असतो. बहुतेक देशांमध्ये हे झाले आहे. त्या त्या वेळी त्या विरोधात आवाज उठवला गेला. आंदोलने झाली, रक्तपात झाला, क्रांती झाली आणि सत्तांतरे झाली. लोकांना हवी तशी राजवट अस्तित्वात येईपर्यंत खदखद होत राहिली व नंतर तेथे शांतता प्रस्थापित झाली.
एका विचाराने नव्हे, तर समूहाच्या विचाराने जे राज्य चालते ते प्रगतीपथावर जाते. तेथील नागरिकांना भयमुक्त वातावरणात जगता येते. त्यांचा सर्वांगिण विकास होतो या बाबी त्या आंदोलनांतून झालेली फलनिष्पत्ती. त्यामुळे लोकशाहीचे महत्त्व कळले. आपल्या विचारांचे आणि अधिकारांचे महत्त्व समजले. त्यांचा वापर करण्याची क्षमता विकसित झाली. या सगळ्या जमेच्या बाजू. गेल्या अर्ध शतकात किंवा त्यापेक्षा जास्त काळ जगाचा प्रवास याच दिशेने राहिला. पण आता पुन्हा उलट दिशेने जाण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे का, असा प्रश्न पडावा अशी स्थिती आहे. त्याला कारण वैचारिक मतभिन्नतेमुळे समाजात निर्माण होत असलेली दुही. राज्य व्यवस्थेत एक व्यक्ती प्रबळ झाली की त्या ठिकाणी अशी दुही निर्माण व्हायला सुरुवात होते. प्रत्येक व्यक्तीचे आपले स्वत:चे काही विचार असतात.
काही विचारांवर त्याची निष्ठा असते. त्याच्याशी त्याने बांधिलकी ठेवण्यात अडचण नाही. मात्र जेव्हा यंत्रणेतील सर्वोच्च पदावर जेव्हा तो जाऊन बसतो तेव्हा व्यक्तीपेक्षा समूहाचा विचार त्याने करणे अपेक्षित असते. तेव्हा आपली बांधिलकी आणि निष्ठा यापेक्षा समाज स्वास्थ्यासाठी आवश्यक काय, याला प्राधान्य देणे अपेक्षित असते. मात्र माध्यमांचा अति सुळसुळाट, तेथे असणारे कथित विचारवंत आणि त्यांनी केलेल्या सुमार लोकांच्या उदात्तीकरणामुळे या सगळ्या प्रक्रियेला खीळ बसण्यास सुरुवात होते. जी व्यक्ती सत्तेची सूत्रे हातात घेऊन बसली असते तिच्या अंगी नॅचरल आणि सुपर नॅचरल असे दोन्ही प्रकारचे गुण चिकटवले जातात. त्यांचा उदोउदो केला जातो. हळूहळू त्यालाही आपल्यातल्या या नव्या संचारलेल्या गुणांची जाणीव होऊ लागते. मग तो तसाच वागायला लागतो आणि त्याचे ते वागणे तऱ्हेवाईक असले तरी त्याला द्रष्टेपणाचा वा अन्य कशाचा तरी मुलामा दिला जातो. अशा व्यक्तीचे विचार मानणारे त्याचे भक्त होतात. पण ज्यांना तारतम्य ठेवून वागण्याची सवय असते त्यांच्या विचारांची दिशा तटस्थ असते. या तटस्थतेलाच मग राष्ट्रविरोधी म्हणून संबोधले जाते.
एक दोन देश नव्हे, तर सगळीकडेच सध्या मानणारा आणि न मानणारा अशा दोन गटांचा संघर्ष सुरू आहे. ती समाजात माजलेली दुफळीच आहे. मध्यंतरीचा काळ काहीसा शांत होता. लेखक, कलाकार मंडळी आपण बरे आणि आपले काम या विचाराने जगत होते. सत्तेच्या दारी लोटांगण घालण्याचा तो काळ नव्हता. त्यांना राजाश्रयही नको होता. लोकाश्रय हीच आपली संपत्ती मानणारे हे लोक होते. पण त्यांचे शांत राहणेही हळूहळू बोचू लागले. त्यांना विनाकारण वादात ओढण्याचे प्रयत्न सुरू झाले. कोणत्याही ज्वलंत विषयावर ते काही बोलत का नाहीत, असे सवाल त्यांना विचारले जाऊ लागले. त्यांच्यावर फैरीही झडू लागल्या. अभिव्यक्ती स्वातंत्र्याचे त्यांना स्मरण करून दिले गेले. तो एक काळ होता. ती मंडळी त्यांच्या परिपक्वतेने गप्प होती. याचा अर्थ अन्यायाला अथवा चुकीच्या गोष्टींना त्यांचे समर्थन नव्हते. मात्र आज वेगळा काळ आला आहे. कोणत्याही विषयाची तपशीलवार माहिती नसताना सर्वज्ञ झालेली मंडळी सगळ्यांच क्षेत्रात दिसू लागली आहेत. त्यांना कोणत्याही विषयाचे वावडे नाही. कोणीतरी येऊन डिवचण्याची वाट पाहतच ते बसलेले असतात. कोणी त्यांच्या वाटेला गेले नाही तरी ते अन्य लोकांचा पाठलाग सुरू करतात. त्यात कलाकारांपासून खेळाडूंपर्यंत सगळ्यांची गर्दी झाली आहे. काहींनी स्वयंप्रेरणेने शक्तिमान व्यक्तीच्या बचावाची आणि त्याच्यासाठीच्या आक्रमणाची जबाबदारी हाती घेतली आहे. यात देशाच्या सीमाही ओलांडल्या जातात. परदेशातील कथित प्रसिद्ध व्यक्तिमत्त्वेही यात उतरतात.
आपण पृथ्वीवरील कोणत्या ठिकाणच्या लोकांबद्दल बोलतो आहोत, त्याचा विषय काय आणि त्या विषयाचा आवाका किती आहे, याच्याशी त्यांना कर्तव्य नसते. एक काळ, कुछ तो बोलो असा होता. तर आता तो प्रवास कुछ मत बोलोपर्यंत येऊन ठेपला आहे. या विचारी व्यक्तींचे विचार ऐकल्यावर आपण कोणत्या दिशेने जातो आहे याची दाहकता जाणवू लागते. वाईट आहे ते विकले जाते हा नवा मंत्र आहे. त्यामुळे विचार न करता विचार मांडणाऱ्या व्यक्तीच्या मुखातून हे नवे वेद वदवून घेतले जात आहेत का? काही माध्यमांवर व्यक्त होण्यासाठी प्रतिभावंतांना, कलावंतांना, खेळाडूंना पैसे मिळतात अशी चर्चा आहे. समाजात त्यांचे अनुकरण करणारे बरेच असतात. त्यामुळे या मंडळींच्या मुखातून अथवा बोटांतून काहीतरी टीवटीवाट करून घेतला की बॅड इज न्यूजच्या आपल्या पॉलिसीला भरती येते याची कल्पना असणारी मंडळी डाव साधतात. आंदोलन असो अथवा नसो, विषय असो वा नसो यांचा गलबलाट जोरात चालतो. ज्यांना हे पटत नाही ते त्यांच्या कंपूत सामील होत नाही. त्यामुळे दुसरा गट अर्थात दरी आपोआप निर्माण होते. तेच ते पुन:पुन्हा ओरडून सांगितले जाते. वातावरण गढूळ केले जाते.
काही तरी वापसीची लाट सुरू होते. कोणीतरी कोणालातरी टीकेचे लक्ष्य करते आणि हे सगळे विचार स्वातंत्र्याच्या मुलाम्याखाली खपवले जाते. अशा प्रकारचे मतभेद असणे आणि ते मांडणे हे लोकशाहीची भरभराट होत असल्याचे लक्षण निश्चितच म्हणता येईल. मात्र मांडणारे त्यांचे स्वत:चे विचार मांडत आहेत की त्यांना उद्युक्त केले जात आहे यावरही ही भरभराट अवलंबून राहते. गेल्या काही काळात तथाकथित सेलिब्रिटींनी या किंवा त्या बाजूने जे विचार मांडले आहेत त्याच्या सत्यतेबाबत अथवा योग्यतेबाबत त्यांना तरी खात्री आहे का? केवळ प्रसिद्धीचे वलय आल्यामुळे त्यांनी बोलावे असे नाही. जेथे बोलायला हवे तेथे बोललेच पाहिजे. पण आपण बोलतोय काय, याचे भानही ठेवले पाहिजे. आपली दोन गटांत विभागणी झाली आहे का, याचेही त्यांनी आत्मपरीक्षण केले पाहिजे.