– निखील जगताप
बेलसर -दिवे (ता. पुरंदर) येथील जाधववाडीमधील सुनील जाधव यांनी आपल्या अंजीर बागेमध्ये नवनवीन प्रयोग करून अधिक उत्पादन घेण्याचा प्रयत्न केला आहे. सुनील जाधव यांनी तीन वर्षांपूर्वी आपल्या 24 गुंठे क्षेत्रावर अंजिराची लागवड केली. दरम्यान, 81 झाडांपासून आत्तापर्यंत त्यांना तब्बल 11 लाख रुपये उत्पन्न मिळाले आहे. सुरुवातीलाच जेसीबीच्या साहाय्याने खड्डे घेऊन त्यात शेणखत बुरशीनाशकाचा वापर करून अंजिराची लागवड केली. लागवडीनंतर दोनच वर्षांत प्रत्यक्ष उत्पादनाला सुरुवात झाली.
पुरंदर तालुक्यातील सुनील जाधव यांनी वेगवेगळे नवीन तंत्रज्ञान औषध फवारणी आणि सूक्ष्म निरीक्षण यातून शेतीतील प्रगल्भता अभ्यासून शेतीत यशस्वी उत्पन्न मिळवले आहे. सुनील जाधव यांनी कल्पकतेचा वापर करून जास्तीजास्त शेणखताचा वापर केला. गरजेप्रमाणे कोंबडी, रासायनिक खते वापरली. सतत ढगाळ वातावरण अवकाळी पाऊस अशा परिस्थितीत वेळेवर औषध फवारणी करत अंजीर बाग वाचवली आहे.
पुरंदर तालुक्यातील डोंगरपट्टा हा अंजीर उत्पादनासाठी प्रसिद्ध असला व तेथील वातावरण अंजीर उत्पादनासाठी अनुकूल असले तरीही अनेक नैसर्गिक अडचणींना शेतकऱ्यांना सामोरे जावे लागते; परंतु जाधव यांनी सर्व संकटांवर मात करत अंजिराचे यशस्वी शेती केली आहे. रासायनिक खताचे भाव मोठ्या प्रमाणात वाढले आहेत. त्यामुळे शेती करणे जिकरीचे होऊन बसले आहे, त्यामुळे त्याला पर्याय म्हणून जास्तीत जास्त शेणखताचा वापर केला जात आहे,
त्यामुळे खर्चात मोठ्या प्रमाणात बचत होत आहे आणि अंजिराचा रंग, आकार, चव अप्रतिम आहे. कष्ट परिश्रम आणि निरीक्षण आणि योग्य नियोजन यामुळे जाधव यांनी यशस्वीतेकडे वाटचाल केली आहे. शेतामधील सर्व कामात जाधव यांना पत्नी सीमा जाधव, आई मंदाकिनी जाधव व मुले मदत करत असतात. त्यामुळे बाहेरचे मजूर घेण्याची आवश्यकता भासत नाही.
एका झाडाला तब्बल 130 किलो अंजीर
शास्त्रज्ञांनी केलेल्या अभ्यासानुसार या झाडाला तब्बल 130 किलो अंजीर आहेत. एक पेटी अंजिरास जवळपास 300 ते 400 रुपये बाजारभाव मिळतो. एका पेटीत 48 नग बसतात त्यामुळे बाजारभाव अधिक असल्याने शेतकऱ्याचा अधिक फायदा झाला आहे.
24 गुंठ्यात 12 ते 13 टन उत्पादन
24 गुंठे क्षेत्रावर आत्तापर्यंत तब्बल 12 ते 13 टनांपर्यंत उत्पादन मिळाले असून अजून तोडे सुरू आहेत. असे जाधव यांनी सांगितले. अंजीराची गोडी आणि चमकदारपणामुळे मुंबई मार्केटमध्ये मोठ्या प्रमाणात मागणी आहे. एका बॉक्समध्ये एकूण 12 अंजीर, असे चार बॉक्सची एक पेटी तयार होते. एका पेटीला मुंबई मार्केटमध्ये सर्वोच्च 300 ते 450 रुपये बाजारभाव मिळाला. बाजारात जाधव यांच्या अंजीर सर्वच दृष्टीने उत्तम गुणवत्तेचे असल्याने त्याला बाजारभाव ही चांगला मिळत आहे.