मुंबई : आज ग्रामपंचायत निवडणुकीचे निकाल जाहीर होत आहेत. राज्यातील एकूण ७ हजार ७५१ ग्रामपंचायतींचा निकाल आज जाहीर होत आहे. थेट सरपंच निवडून देण्याच्या नव्या नियमांनुसार पार पडलेल्या निवडणुकींचा निकाल जाहीर होत असून महाविकास आघाडीतील घटक पक्ष बाजी मारतात की सत्ताधारी शिंदे गट आणि भारतीय जनता पार्टी सर्वाधिक जागा जिंकते याकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलेले आहे. दरम्यान, जळगाव ग्रामपंचायत निवडणुकणांच्या निकालात सत्ताधारी भाजप आणि शिंदे गटाला मोठा धक्का बसला आहे.
एकनाथ खडसे यांनी गड कायम राखला आहे. कुर्हा ग्रामपंचायतीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे बिपिन महाजन यांचे पॅनल विजयी झाले आहे. तर उचंदे ग्रामपंचायतीवर अपक्ष उमेदवार विजयी झाले आहेत. दरम्यान, काही दिवसापूर्वीच जळगाव दूध महासंघाची निवडणूक पार पडली त्यात भाजपची सरशी झाली होती. त्यामुळे आजच्या या ग्रामपंचायत निकालाकडे सर्वांचे लक्ष लागले होते. मात्र, भाजपा, शिंदे गटाला धक्का देत एकनाथ खडसेंनी गड कायम राखला असल्याचे पाहायला मिळत आहे.