रावणगाव येथे दोन महिन्यांपासून साथीच्या आजारांनी नागरिक हैराण
रावणगाव – येथील वार्ड क्रमांक चारमधील कांबळे वस्ती, मेंढवाडगा वस्तीवरील महिलांनी बुधवारी (दि. 8) येथील या परिसरात सांडपाणी व्यवस्थापनासाठी चेंबर बसविण्यासंदर्भात सरपंच आणि ग्रामपंचायत प्रशासन रावणगांव (ता. दौंड) ला निवेदन अर्ज दिला. हे काम न झाल्यास ग्रामपंचायत कार्यालयाला टाळे लावून निषेध केला जाईल, असा इशाराही या महिलांनी निवेदनात दिला आहे.
रावणगाव (ता. दौंड) येथील वार्ड क्रमांक चारमधील कांबळे वस्ती, मेंढवाडगा परिसरात सांडपाण्याची योग्य विल्हेवाट लावली जात नसल्याने तेथे सर्वत्र उघड्यावर स्वच्छतागृहाचे पाणी व सांडपाणी सोडले जात आहे. या पाण्याचा जमिनीत योग्य निचरा होत नाही, त्यामुळे परिसरात दुर्गंधी पसरून वस्तीवरील अनेक नागरिक सुमारे दोन महिन्यांपासून थंडीताप, खोकला, हिवताप, डेंग्यू, चिकुनगुणिया यांसारख्या आजारांनी त्रस्त असल्याचे येथील महिलांनी या अर्जात नमूद केले आहे.
या निवेदनाची प्रत महिलांनी ग्रामविकास अधिकारी – रावणगाव, तहसीलदार – दौंड, पोलीस निरीक्षक दौंड, तालुका आरोग्य अधिकारी – दौंड, तसेच प्राथमिक आरोग्य केंद्र – दौंड यांना दिली आहे. यावेळी रावणगावचे सरपंच शिवाजी आटोळे यांनी हे निवेदन स्वीकारले असून, लवकरच या ठिकाणाची पाहणी करून, जागा मोजून काम सुरू करून हा प्रश्न तातडीने मार्गी लावू, असे सांगितले. यावेळी दौंड पंचायत समितीचे माजी उपसभापती उत्तम आटोळे, भीमा पाटस कारखान्याचे संचालक विनोद गाढवे, संपत आटोळे, रावणगावचे माजी सरपंच धनाजी आटोळे आदी मान्यवर उपस्थित होते.
उपसरपंचांच्या वॉर्डातच समस्या
गेल्या वर्षभरापासून रावणगावचे उपसरपंचपद भूषवित असलेल्या मनिषा भोपाळ यांच्याच वार्डात ही समस्या असल्याने त्यांच्याच नेतृत्वाखाली सर्व महिलांनी ग्रामपंचायत कार्यालयात जाऊन एका अर्जाद्वारे ग्रामपंचायत रावणगावला सांडपाण्याचे चेंबर बसविण्याची विनंती केली असून, या अर्जावर 33 महिलांनी सह्या केल्या आहेत.