नवी दिल्ली – नवीन वर्षाच्या पहिल्या दिवसापासूनच रेल्वे प्रवाशांच्या खिशावर तिकीट दर वाढीचं ओझं पडणार असून याबाबतची अधिकृत घोषणा आज रेल्वेकडून करण्यात आली आहे. रेल्वेद्वारे जाहीर करण्यात आलेली ही दरवाढ उपनगरांदरम्यान धावणाऱ्या रेल्वे गाड्या वगळता अन्य सर्व गाड्यांवर लागू केली जाईल असं देखील स्पष्ट करण्यात आलं आहे.
अशी असेल दरवाढ : एसी विरहित सामान्य गाड्यांसाठी प्रति किलोमीटर १ पैशाने वाढ करण्यात आली असून एसी विरहित एक्सप्रेस गाड्यांसाठी प्रति किलोमीटर २ पैसे तर एसी गाड्यांसाठी ४ पैसे प्रति किलोमीटर वाढ करण्यात आली आहे. शताब्दी, राजधानी आणि दुरंतो या ‘प्रीमियम’ गाड्यांमध्ये देखील भाडेवाढ करण्यात आली आहे. ही दरवाढ १ जानेवारीपासून लागू केली जाईल.
रेल्वेतर्फे जाहीर करण्यात आलेल्या या आदेशानुसार आरक्षण शुल्क आणि तात्काळ शुल्कामध्ये कोणताही बदल करण्यात येणार नसून सुधारित भाडेवाढ याआधी आरक्षित करण्यात आलेल्या तिकिटांवर लागू करण्यात येणार नाही असं देखील स्पष्ट करण्यात आलं आहे