पुणे :- नियमित शिक्षण घेताना विज्ञान विषयात रुची निर्माण व्हावी आणि विद्यार्थ्यांच्या वैज्ञानिक दृष्टिकोनाला चालना मिळावी यासाठी प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. प्रदर्शनाद्वारे विद्यार्थी आणि बाल वैज्ञानिकांच्या सृजनशीलतेला चालना मिळते. विविध संस्था आणि देशभरातील विद्यार्थ्यांच्या सहभागाद्वारे हे केवळ विज्ञान प्रदर्शन न राहता विज्ञानाचा उत्सव झाला आहे. या प्रदर्शनाला अनेक विद्यार्थी भेट देणार असल्याने वैज्ञानिक दृष्टिकोन दर्शविणारे हे वादळ प्रत्येक घरापर्यंत पोहोचेल, असा विश्वास राज्यपाल रमेश बैस यांनी व्यक्त केला.
नवी दिल्ली येथील राष्ट्रीय शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र राज्य शालेय शिक्षण व क्रीडा विभाग आणि राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेतर्फे बालेवाडीतील श्री शिवछत्रपती क्रीडा संकूल येथे आयोजित ५० व्या राष्ट्रीय बाल वैज्ञानिक प्रदर्शनाचे उद्घाटन राज्यपाल रमेश बैस यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार, उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर, शालेय शिक्षण विभागाचे प्रधान सचिव रणजितसिंह देओल, एनसीईआरटीचे सहसंचालक डॉ. श्रीधर श्रीवास्तव, शालेय शिक्षण आयुक्त सूरज मांढरे, राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेचे संचालक अमोल येडगे आदी उपस्थित होते.
माजी राष्ट्रपती एपीजे अब्दुल कलाम हे इच्छाशक्ती आणि आत्मविश्वासाच्या बळावर राष्ट्रपती पदापर्यंत पोहोचले. प्रत्येक व्यक्तीत असा गुण असतो आणि इच्छाशक्तीच्या माध्यमातून तो समोर येतो. बाल वैज्ञानिकांच्या या प्रदर्शनातूनही अशाचप्रकारे भविष्यातील वैज्ञानिक तयार होतील, त्यांच्या वैज्ञानिक अविष्कारातून नवे पेटंटची नोंद केली जाईल आणि हेच बाल वैज्ञानिक राष्ट्राच्या वैज्ञानिक प्रगतीत हातभार लावतील, असा विश्वास रमेश बैस यांनी व्यक्त केला.
दहा हजार विद्यार्थी रोज भेट देणार…
राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेचे संचालक अमोल येडगे यांनी प्रास्ताविकात बाल विज्ञान प्रदर्शनाविषयी माहिती दिली. यावर्षी १७३ बाल वैज्ञानिकांनी आपल्या प्रतिकृतीसह या प्रदर्शनात सहभाग घेतला आहे. दररोज १० हजार विद्यार्थी, शिक्षक, पालक प्रदर्शनाला भेट देतील. या कालावधीत राज्यभरातील शाळांमध्ये विज्ञान पंधरवडा साजरा करण्यात येणार आहे, असे येडगे यांनी सांगितले.
नव्या शैक्षणिक धोरणानुसार हे प्रदर्शन महत्वाचे आहे. नव्या युगातील गरजा लक्षात घेऊन तंत्रज्ञान आणि कौशल्य विकासाच्या क्षेत्रात आपल्याला लक्ष द्यावे लागेल. शिक्षणाच्या माध्यमातून रोजगार उपलब्ध व्हावा यासाठी चांगले तंत्रज्ञान विद्यार्थ्यांसमोर ठेवावे लागेल. या प्रदर्शनातील विद्यार्थ्यांच्या वैज्ञानिक अविष्कारातून शालेय विद्यार्थ्यांना प्रेरणा मिळेल आणि त्यातून जगाचे नेतृत्व करणारे विद्यार्थी घडतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. ‘माझी शाळा सुंदर शाळा’ अभियान राज्यात राबविले जात असल्याचे शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी सांगितले.