मुंबई – एमव्ही केम प्लुटो आणि लाल सागरात एमव्ही साईबाबा या जहाजावर झालेल्या हल्ल्यानंतर भारताने आक्रमक भूमिका घेतली आहे. भारताच्या सागरी हद्दीत नौकांवर हल्ले करणाऱ्यांना समुद्राच्या तळाशी जाऊन शोधून काढू आणि त्यांच्याविरोधात कठोर कारवाई करण्यात येईल, असा इशारा केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी दिला आहे.
राजनाथ सिंह म्हणाले, सध्या समुद्रात हालचाली वाढल्या आहेत. भारताची वाढती आर्थिक आणि युद्धशक्ती पाहून काही शक्तींना ईर्ष्या वाटत आहे. काही दिवसांपूर्वी अरबी समुद्रात केम प्लुटो या व्यापारी नौकेवर झालेला ड्रोनहल्ला आणि लाल समुद्रात साईबाबा या व्यापारी नौकेवर झालेल्या हल्ल्याची भारत सरकारने गांभीर्याने दखल घेतली असल्याचे त्यांनी सांगितले.
भारतीय नौदलाने समुद्रातील देखरेख वाढवली आहे. ज्यांनी कोणीही हे हल्ले घडवले असतील त्यांचा पातळापर्यंत शोध घेतला जाईल आणि त्यांच्याविरोधात कठोर कारवाई केली जाईल, असे राजनाथ सिंह यांनी म्हटले.
दरम्यान, अरबी समुद्रात भारतीय सागरी हद्दीत एका इस्रायली व्यापारी जहाजावर ड्रोन हल्ला झाल्याची घटना नुकतीच समोर आली होती. या हल्ल्यामुळे जहाजावर आग लागून जहाजाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. सुदैवाने या हल्ल्यात कोणतीही जीवितहानी झाली नाही. या हल्ल्यापाठोपाठ लाल समुद्रात भारताचा झेंडा असलेल्या एका जहाजावर ड्रोन हल्ला झाल्याचेही समोर आले होते.