मुंबई – देशाचे पहिले पंतप्रधान दिवंगत पंडित जवारहरलाल नेहरू यांच्या मृत्यूला अनेक दशके उलटून गेली आहे. मात्र आजही नेहरूंना लक्ष्य करण्यात येते. आता तर खुद्द राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनीच नेहरूंवर हल्लाबोल केला आहे. एका पुस्तक प्रकाशन सोहळ्यात ते बोलत होते.
कारगिल विजयदिनानिमित्त ‘अशक्य ते शक्य’ या पुस्तकाचे प्रकाशन कोश्यारी यांच्या हस्ते झालं. यावेळी विरोधीपक्षनेते देवेंद्र फडणवीस, आणि आमदार मंगलप्रभात लोढा उपस्थित होते.
पंडित जवाहरलाल नेहरू यांना शांतीदूत बनायचं होतं. त्यामुळे देश कमकुवत झाला. त्यांचं हे धोरण खूप वेळ सुरूच राहिलं, असं विधान कोश्यारी यांनी केलं. पुढे ते म्हणाले, मी पंडित जवाहरलाल नेहरुंचा खूप आदर करतो. पण कदाचित त्यांची कमजोरी होती की त्यांना वाटयचं की शांतीदूत बनावं, कबूतरं उडवावी. यामुळे देश कमकुवत झाला आणि खूप वेळापर्यंत हे सुरू होतं. अटलबिहारी यांचा कार्यकाळ सोडून दिला तर त्याआधी वाटलं की देशाच्या सुरक्षेबाबत लोकांचं लक्ष खूप कमी आहे.
दरम्यान अटलबिहारी वाजपेयी यांनी १९९८ मध्ये अणुचाचणी घेतली. त्याआधी अनुबॉम्ब २० वर्षे तसाच पडून होता. जगाने आपल्यावर निर्बंध आणले. मात्र अटजींना देशातील लोकांवर विश्वास होता, असंही कोश्यारी यांनी नमूद केलं. यावेळी त्यांनी मोदींच्या हातात देश सुरक्षित असल्याचं म्हटलं.