कर्जत, {विजय डेरवणकर}– कर्जत तालुक्यामध्ये कुपोषणाचे प्रमाण वाढले आहे. यंदाच्या वर्षी २०१ बालकांची नोंद झाली आहे. गेल्यावर्षी १४६ कुपोषित बालकांची नोंद झाली होती. अंगणवाडी सेविकांच्या संपामुळे कुपोषित बालकांपर्यंत पोषक आहार न पोहोचल्याने ही संख्या वाढल्याचे बोलले जात आहे. कर्जत तालुक्यात आदिवासी वाड्या–वस्त्यांचे प्रमाण मोठे आहे.
शिक्षणाचा अभाव, समाजाच्या मुख्य प्रवाहापासून दूर असलेल्या या समाजात कमी वयात लग्न करण्याची प्रथा आहे. त्यामुळे बालमाता, वेळेआधीच प्रसूती, नवजात शिशूची योग्य वाढ होत नसल्याने कुपोषणाचा सामना करावा लागतो.
जिल्हा परिषदेच्या महिला बालविकास विभागाकडून दर महिन्याला बालकांची तपासणी केली जाते. जिल्ह्यातील कुपोषणाचे सर्वात जात प्रमाण कर्जत तालुक्यात आहे.
सहा वर्षांपूर्वी मोरेवाडी येथे सोनाली पादीर या १८ महिन्यांच्या मुलीचा कुपोषणामुळे मृत्यू झाला होता. त्यानंतर सरकारी यंत्रणा खडबडून जागी झाली होती. जिल्हा परिषदेच्या महिला व बालकल्याण विभागाच्या वतीने दर महिन्यात बालकांचे वजन घेण्यात येते आणि उंची मोजली जाते. यासाठी जागतिक आरोग्य संघटनेच्या वतीने वयानुसार बालकांचे किमान वजन व उंची किती असली पाहिजे, याचे निकष निश्चित केले आहेत. या निकषाच्या आत वजन आणि उंची भरल्यास, संबंधित बालक हे कुपोषित समजले जाते.
ग्रामीण भागातील कुपोषण कमी करण्यासाठी राबवण्यात येणाऱ्या विविध योजनांमध्ये अंगणवाडी सेविकांनी काम महत्त्वपूर्ण आहे. अंगणवाडीत येणाऱ्या मुलांना ताजे अन्न शिजवून देण्याबरोबरच लाभार्थ्यांना घरपोच सुक्या अन्नांच्या पाकिटांचेही त्यांना वाटप करावे लागते; मात्र संपामुळे बहुतांश अंगणवाड्यांमध्ये पोषण आहाराचे वाटप ठप्प झाले होते.
अंगणवाडी सेविकांनी संप केला होता. हेच वाढत्या कुपोषणाचे कारण असल्याचे म्हटले जाते. संपामुळे अंगणवाड्यांच्या माध्यमातून कुपोषित बालकांना शिजवून दिला जाणारा ताजे अन्न मिळालेच नाही. त्याचबरोबर स्तनदा माता, गर्भवतींना जाणाऱ्या सुक्या आहाराच्या पाकिटांचेही वाटप वेळेवर झाले नाही.
संप मिटल्याने दिलासा
अंगणवाडी सेविका मुलांची वजन, उंची, त्याचं वृद्धिमापन करतात, त्यानुसार साधारण, मध्यम कुपोषित, तीव्र कुपोषित अशी श्रेणी काढतात. गर्भवतींना आहाराबाबत सल्ला देणे, लसीकरणाबद्दल माहिती देणे, स्तनदा महिलांची घरी जाऊन चौकशी करणे, दर महिन्याला लहान मुलांची वजन करून आहार सल्ला देणे आदी कामे अंगणवाडी कर्मचाऱ्यांकडून केली जातात. संपामुळे महिनाभर ही सर्व कामे खोळंबली होती. आता ही कामे पुन्हा सुरू झाली आहेत.