कर्जत, (प्रतिनिधी): औद्योगिक वसाहतीचा सदोष प्रस्ताव शासनाने नाकारला तरी कर्जत बंद ?, शासनाने आता कोंभळी येथील जागेसाठी तत्वतः मंजुरी दिली तरी कर्जत बंद ?, कोणावर ईडीची कारवाई झाली तरी कर्जत बंद ?, कर्जत बंद करणाऱ्या बंद बहाद्दरानी कन्नड साखर कारखान्याची मालमत्ता इडीने जप्त केल्यावर कर्जत बंद का केले नाही ? असा सवाल करत आ. प्रा. राम शिंदे यांनी राजकीय भूमिका घेऊन बंद करणाऱ्यांवर टीका केली.
एमआयडीसीला तत्वतः मंजुरी मिळाल्याची अधिसूचना निघाली म्हणून मिरजगाव येथे नागरिकांनी लाडू वाटून आनंद व्यक्त केला. आमदार शिंदे यांना नागरिकांनी लाडू भरवत त्यांचा सत्कार केला.आ. शिंदे यांनी एमआयडीसी संदर्भातील केलेल्या प्रयत्नांची माहिती आणि विरोधकांच्या आरोपाचा खरपूस समाचार घेतला.
एमआयडीसीसंदर्भात कर्जत तालुक्याचे आमदार आणि त्यांच्या बगलबच्चांनी अगदी खालच्या पातळीवर जाऊन टीका केली. आ.राम शिंदे यांना उद्योगातील काही समजत नाही, आम्ही उद्योग चालवतो, त्यांनी गुऱ्हाळ तरी चालू केले का? एमआयडीसी मीच करणार, अशी वल्गना करत टीका करत होते, परंतु त्यावेळी त्यांच्या कोणत्याही टीकेला उत्तर न देता दोन महिन्यांच्या कालावधीत आपण १२०० एकर प्रस्तावित जागेसाठी तत्वतः मान्यता मिळवली. त्यामुळे लोकप्रतिनिधी अस्वस्थ असल्याची टीका आ. राम शिंदे यांनी आ. रोहित पवार यांच्यावर केली.
वालवड सुतगिरणी संदर्भात प्रश्न उपस्थित करणाऱ्यांचा देखील समाचार घेतला.रोहयो विहिरीच्या चौकशीसाठी कोणी दबाव आणला ? माहिती कागदपत्रासहित जनतेपुढे मांडू, असा इशारा दिला. मोफत पाणी पुरवठा करण्याचे नाटक सेवाभावी संस्था पुढे करत करायचे आणि झेपत नाही म्हणून शासनाकडे परवानगीची नाटके करत बंद करायचे.
तुमच्या राजकारणासाठी जनतेला तुम्ही वेठीस धरू नका. तुम्ही जनतेला मोफत पाणी देऊ शकत नाही, फक्त देण्याचे नाटक निवडणूक डोळ्यासमोर ठेवून करता, आता त्याचा फारसा उपयोग होणार नाही हे तुमच्या लक्षात आल्यामुळे परवानगीचे नाटक तुम्ही बंद केले आहेत. कर्जत-जामखेडमधील जनतेचे हिरं का भाजता? असा संतप्त सवाल त्यांनी केला.
एमआयडीसी इतक्या कमी कालावधीत मंजूर होणे हेच मुळात विरोधकांच्या पचनी पडलेले नाही. त्यातही एमआयडीसाठी जागा लोकांनी निवडलेली आहे. अवर्षणप्रवण भागातील जनतेसाठी हा एक मोठा दूरगामी परिणाम करणारा निर्णय होणार आहे. त्यामुळे विरोधक सैरभैर झाले आहेत. त्यांना फक्त व्यवहार कळतो.
कोणाचे तरी आर्थिक हितसंबंध जपताना जनतेला वाऱ्यावर सोडण्याचे त्यांचे धोरण आहे. आमदार आणि मविआ सत्तास्थानी असण्याच्या काळात कोणत्याही प्रश्नाची सोडवणूक त्यांच्याकडून झालेली नाही, त्यामुळे ते उद्विग्न अवस्थेत असून बिनबुडाचे आरोप करण्यात धन्यता मानत आहेत, असा टोला आ.राम शिंदे यांनी लगावला .
यावेळी बाजार समितीचे सभापती काकासाहेब तापकीर, माजी जिल्हा परिषद सदस्य परमवीर पांडुळे, अशोक खेडकर, अमृत लिंगडे, प्रशांत बुद्धिवंत, नितीन खेतमाळस, डॉ. रमेशचंद्र झरकर, संदिप बुद्धिवंत, संपत बावडकर, लहू वतारे, नंदू नवले, तात्या खेडकर, दत्ता मुळे, काशिश्वर बुद्धिवंत, संतोष कोरडे, कैलास बोराडे, सारंग घोडेस्वार, मिनिनाथ शिंदे, हरिदास केदारी, सोमनाथ साबळे, संग्राम घोडके आदींसह परिसरातील नागरिक, व्यापारी मोठ्या संख्येने उपस्थित होते .
औद्योगिक वसाहतीसाठी कर्जत तालुक्यातील कोंभळी, रवळगाव, थेरगाव या ठिकाणी महायुती सरकारने तत्वतः मान्यता दिली. आता पुढील कायदेशीर प्रकिया थोड्यांच दिवसात पूर्ण होऊन एमआयडीसी होण्याच्या हालचालींना वेग आला आहे. मिरजगाव परिसरासाठी अत्यंत दूरगामी परिणाम करणारा हा निर्णय आहे.
अवर्षण प्रवण भागात एमआयडीसी होण्यामुळे कोंभळी, मिरजगाव परिसराचा कायापालट होणार आहे. एकूणच कर्जत तालुक्यातील युवकांना रोजगाराच्या प्रत्यक्ष, अप्रत्यक्ष संधी मोठ्या प्रमाणावर उपलब्ध होणार आहे. त्यामुळे याचा आनंद कर्जत तालुक्यातील प्रत्येक नागरिकांना होणे साहजिक आहे. – शेखर खरमरे, तालुकाध्यक्ष, भाजपा