नवी दिल्ली: केंद्र सरकारने इंधनाच्या दरात लॉकडाऊनच्या काळात तब्बल 22 वेळा करवाढ करून लोकांच्या पैशाची लूट केली आहे. ही दरवाढ त्यांनी त्वरीत मागे घ्यावी अशी मागणी कॉंग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनी केली आहे.
लोकांच्या पैशातून इंधनाच्या व्यवहारात नफेखोरी केली जात आहे असा आरोपहीं त्यांनी केला. संकटाच्या काळात लोकांना मदत करणे हे सरकारचे कर्तव्य असते पण याच संकटाच्या काळात हे सरकार लोकांच्या पैशाची सर्रास लूट करीत आहे असा आरोप त्यांनी केला.
कॉंग्रेस पक्षातर्फे आज संपुर्ण देशभर स्पीक अप अगेंस्ट फ्युएल हाईक हा उपक्रम राबवला गेला. त्यात सहभागी होताना त्यांनी हा आरोप केला. कॉंग्रेसने आज त्या अनुषंगाने संपुर्ण देशभर निदर्शनेही आयोजित केली होती.
यावेळी बोलताना सोनिया गांधी म्हणाल्या की मार्च महिन्यापासून सरकारने इंधनावर जी उत्पादन शुल्क वाढ केली आहे ती त्यांनी त्वरीत मागे घेतली पाहिजे. कच्चा तेलाच्या किंमतीत झालेली घसरण ही लोकांच्या कामी आली पाहिजे असेही त्यांनी नमूद केले.
करोनाच्या संकट काळात लोक आर्थिक अडचणीत आले आहेत. त्यांना आर्थिक दिलासा देण्यासाठी इंधन दरवाढ कमी करणे अत्यंत आवश्यक आहे असेही त्यांनी म्हटले आहे. लोकांनी कष्टाने कमावलेला पैसा सरकारची तिजोरी भरण्यासाठी वापरणे योग्य नाही असेही त्यांनी नमूद केले. सरकारने लोकांच्या अडचणीच्या काळात गैरफायदा घेऊ नये असे आवाहनही सोनिया गांधी यांनी केले.