नवी दिल्ली – हिमाचल प्रदेश विधानसभेच्या प्रवेशद्वारावर खलिस्तानचे झेंडे लावलेले आढळल्यानंतर,त्या विषयावरून ैआम आदमी पक्षाने भाजपवर जोरदार हल्लाबोल केला आहे. भाजपला राष्ट्रीय सुरक्षा सुनिश्चीत करण्यात साफ अपयश आले असून हे सरकार देशातील लोकांना कसे वाचवणार आहे असा प्रश्न या पक्षाने उपस्थित केला आहे.
दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांनी ट्विटरवर म्हटले आहे की, धर्मशाला येथील हिमाचल विधानसभेच्या इमारतीच्या बाहेर खलिस्तानचे झेंडे लावणे हे राष्ट्रीय सुरक्षेशी संबंधित प्रकरण असून ते हाताळण्यात आणि लोकांना सुरक्षेची खात्री देण्यात भाजप सरकारला अपयश आले आहे.
संपूर्ण भाजप एका गुंडाला वाचवण्याचा प्रयत्न करत आहे आणि खलिस्तानी समर्थक तिकडे झेंडे लावत आहेत असे सिसोदिया यांनी ट्विटरवर नमूद केले आहे. त्यांचा संदर्भ तेजिंदर बग्गा यांच्या अनुषंगाने होता. बग्गा यांना अटक करण्यासाठी गेलेल्या पंजाब पोलिसांच्या पथकाला भाजपच्या हरियाना आणि दिल्ली सरकारच्या पोलिसांनी अटकाव केला होता.
त्या अनुषंगानेहीं त्यांनी भाजपवर ही टीका केली. सिसोदिया यांनी म्हटले आहे की, ज्यांना आपल्या विधानसभेची नीट सुरक्षा करता येत नाही ते सत्ताधारी, लोकांना अशा संकटापासून कसे वाचवणार असा सवालही त्यांनी केला आहे.