बॅंकॉक -“बीडब्ल्यूएफ’ थॉमस आणि उबर चषक बॅडमिंटन स्पर्धेत भारताच्या मोहिमेला रविवारपासून प्रारंभ होणार आहे. क-गटातील पुरुष संघाची सलामी जर्मनीशी, तर ड-गटातील महिलांची कॅनडाशी पहिली लढत कॅनडाशी होणार आहे. या स्पर्धेत भारताला ऑलिम्पिक पदक विजेती पीव्ही सिंधू आणि जागतिक चॅम्पियनशीमध्ये कांस्य पदक विजेता लक्ष्य सेनकडून पदकांची आशा आहे.
ही स्पर्धा बॅंकॉक येथे दि. 8 ते 15 मे या कालावधीत पार पडणार आहे. भारताची धुरा किदम्बी श्रीकांत, लक्ष्य सेन आणि पीव्ही सिंधू यांच्यावर असेल. पुरुषांच्या थॉमस चषक स्पर्धेत इंडोनेशियाचा संघ बलाढय मानला जातो. त्यांनी आतापर्यंत 14 जेतेपदे पटकावली आहेत. या स्पर्धेत भारताला अद्याप एकही पदक जिंकता आलेले नाही.
यंदा एकेरीत जागतिक क्रमवारीत 9व्या क्रमांकावर असलेला लक्ष्य सेन, 11व्या क्रमांकावर असलेला किदाम्बी श्रीकांत आणि एच प्रणॉय यांचा समावेश असलेला एक मजबूत पुरुष संघ आहे. दुहेरीचे नेतृत्व सात्विकसाईराज रॅंकीरेड्डी आणि चिराग शेट्टी या जगातील 9व्या क्रमांकाच्या जोडीकडे असेल, तर एमआर अर्जुन आणि ध्रुव कपिला, कृष्ण प्रसाद गरगा आणि विष्णुवर्धन गौड पंजाला या जोडीचाही संघाचा भाग आहे.
याचप्रमाणे महिलांच्या उबर चषक स्पर्धेत चीनने सर्वाधिक 15 जेतेपदे जिंकून आपले वर्चस्व राखले आहे. गतवर्षी आरहस (डेन्मार्क) येथे झालेल्या थॉमस चषक स्पर्धेत इंडोनेशियाने आणि उबर चषक स्पर्धेत चीनने विजेतेपद पटकावले होते. भारतीय महिला बॅडमिंटनपटूंनी 2014 आणि 2016मध्ये दोन कांस्यपदके जिंकत सलग दोन वेळा उपांत्य फेरी गाठली होती.