ठाणे: राज्यातील सरकार 11 दिवसात कोसळेल, असे भाकीत भाजप नेते नारायण राणे यांनी केले आहे. भिवंडी लोकसभेचे खासदार कपिल पाटील यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून कपिल पाटील फाऊंडेशन यांच्या वतीने आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते.
राज्यातील एकूण घडामोडी पाहता हे सरकार आज पडेल की उद्या अशी परिस्थिती निर्माण झाल्याचे राणे म्हणाले. पण मी त्यांच्यासाठी अकरा दिवसांची मुदत वाढवून देतो. अकरा दिवसांमध्ये सरकार पडेल का? हे माध्यमांनी पाहावं पण मला वाटत हे सरकार कोणत्याही क्षणी कोसळेल, असे भाकीत नारायण राणेंनी केले. हे सरकार कोणत्याही प्रकारे जनतेच्या अपेक्षा पूर्ण करू शकलेले नाही, विकास कामे, शेतकऱ्यांची कर्जमाफी करण्याबाबत फक्त आश्वासने दिली. पण पूर्तता करण्याची क्षमता ना मुख्यमंत्री, ना या सरकारमध्ये आहे. फक्त सत्तेसाठी व पदासाठी व सत्तेतून पैसा व पैशातुन सत्ता यासाठी एकत्र आलेली ही मंडळी असल्याचा आरोपही नारायण राणे यांनी यावेळी केला.
शिवसेनेने भूमिका बदलली –
सुधारित नागरीकत्व कायद्या संदर्भात शिवसेनेने सुरुवातीला पाठिंबा दिला होता. मात्र, राज्यसभेत त्यांनी पलटी मारली. मात्र, पुन्हा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना भेटल्यानंतर त्यांची भूमिका बदलली हे चांगले झाल्याचे राणे यांनी सांगितले. चांगल्याला चांगले म्हणणे हा माणुसकीचा धर्म आहे. भाजप, सेना भविष्यात एकत्र येतील का? यावर हे सांगण्यासाठी मी ज्योतिष नाही. त्यासाठी ज्योतिषाकडे जावे लागेल, पण भविष्यात काहीही होऊ शकते, अशी समीकरणे मीडियातून दिसून येत असल्याचेही राणे म्हणाले.