नवी दिल्ली – एअर इंडियाच्या विक्रीसाठी सरकार सातत्याने प्रयत्नशील आहे. तथापी या विक्री बाबत संबंधीत गुंतवणुकदारांना काहीं प्रश्न विचारायचे असल्यास त्यासाठीची मुदत सरकारने आणखी वाढवली असून ती आता 6 मार्च पर्यंत करण्यात आली आहे. सरकारने गुंतवणुकदारांसाठी स्पष्टीकरणाची पहिली माहिती जानेवारी 27 जानेवारी रोजी जारी केली होती. या संबंधात ज्यांना आणखी काही प्रश्न लेखी विचारायची असेल तर त्यासाठी 11 फेब्रुवारीपर्यंत मुदत देण्यात आली होती. ही मुदत आता 6 मार्च पर्यंत वाढवण्यात आली आहे.
त्यानंतर प्रत्यक्ष खरेदीसाठीच्या निवीदा सादर करण्याची मुदत 17 मार्च पर्यंत ठेवण्यात आली आहे. ज्या गुंतवणुकदारांची नक्त मालमत्ता किमान 3500 कोटी आहे त्यांनीच या निवीदा सादर कराव्यात अशी अट यात ठेवण्यात आली आहे. सरकार एअर इंडियातील आपला शंभर टक्के वाटा विकणार आहे. सरकारने त्यासाठी दोन वर्षांपुर्वीच निवीदा जारी केल्या आहेत पण सरकारला अजून एकही खरेदीदार मिळालेला नाही.
सन 2018 साली सरकारने जेव्हा एअर इंडिया विकायला काढली होती, त्यावेळी सरकारने आपला 76 टक्के वाटा विक्रीला काढला होता, पण यावेळी मात्र सर्व शंभर टक्के हिस्सा सरकार विकणार आहे. एअर इंडियावर सध्ये 60 हजार 74 कोटी रूपये इतके कर्ज आहे. खरेदीदाराने यातील किमान 23 हजार 286 कोटी रूपयांचा हिस्सा खरेदी करावा अशी सरकारची अपेक्षा आहे. बाकीची रक्कम एअर इंडिया ऍसेट होल्डिंग कंपनी स्थापन करून त्यात ट्रान्स्फर केली जाणार आहे.