मुंबई – महाराष्ट्रात सत्तांतर होऊन आता महिना पूर्ण झाला तरीही खातेवाटप होत नाही. यावर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या खासदार सुप्रियाताई सुळे यांनी राज्यातील सरकार हे ‘एक दुजे के लिए’ असे दोघांचेच सरकार असल्याची खोचक टीका केली आहे.
राज्यात पावसामुळे ओला दुष्काळ पडला असताना जिल्ह्यात पालकमंत्री नाहीत, प्रशासनाला निर्णय कोण घेत आहे हे माहिती नाही, जिथे मदतीची गरज आहे तिथे मंत्रीच उपलब्ध नाहीत, अशी खंत सुप्रिया सुळे यांनी व्यक्त केली. महाराष्ट्र कुठे नेऊन ठेवणार हे देवालाच ठाऊक असे देखील त्या म्हणाल्या.
दरम्यान, देशाच्या अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांचा देशात आर्थिक मंदी येणार नाही हा दावा हास्यास्पद आहे, असा शेरा सुप्रिया सुळे यांनी मारला. देशात आर्थिक मंदी सर्वत्र दिसत आहे, त्यामुळे केवळ सरकारच्या विरोधात टीका करण्यासाठी आम्ही बोलत नसून यातून ठोस मार्ग काढायला हवा, अशी काल लोकसभेत झालेल्या चर्चेमागील आमची भूमिका होती. देशाची आर्थिक परिस्थिती सुधारावी हाच आमचा प्रयत्न आहे, असे त्यांनी सांगितले.
संजय राऊत यांच्यावर झालेल्या ईडी कारवाईवरही सुप्रिया सुळे यांनी आपली प्रतिक्रिया व्यक्त केली. संजय राऊत यांच्या आधी अनिल देशमुख आणि नवाब मलिक यांच्यावरही ईडी कारवाई करण्यात आली आहे. या तीनही केसमध्ये एक साम्य आहे की, त्यांची मुलं याविरोधात ज्यापद्धतीने लढत आहेत त्याचा मला सार्थ अभिमान आहे. यात दूध का दूध आणि पानी का पानी निश्चित होईल.
पुढे आदित्य ठाकरे यांच्या दौऱ्याला मिळणाऱ्या जनतेच्या प्रतिसादाबद्दल सुप्रिया सुळे म्हणाल्या की, जो लढतो, कष्ट करतो त्याला लोक नेहमीच प्रतिसाद देतात. जो राज्यासाठी कष्ट करतो, राज्याला न्याय देतो, गरीब जनतेचा आवाज बनतो त्याच्यामागे जनाता उभी राहते, हा इतिहास महाराष्ट्राने पाहिला आहे, असे देखील सुप्रिया सुळे म्हणाल्या.