मुंबई :- लघु व मध्यम उद्योग देशाच्या अर्थव्यवस्थेचा कणा असून देशाला आत्मनिर्भर बनविण्यात लघु व मध्यम उद्योग मोलाचे योगदान देत आहेत. सर्वसमावेशक विकासाच्या दृष्टीने या उद्योगांना चालना देण्यासाठी राज्य शासन कटिबद्ध आहे, असे प्रतिपादन राज्यपाल रमेश बैस यांनी केले.
राज्यपाल बैस यांच्या प्रमुख उपस्थितीत लघु आणि मध्यम उद्योजकांची प्रमुख संघटना ‘एसएमई चेंबर ऑफ इंडिया’ या संस्थेचा ३० वा वर्धापन दिवस तसेच इंडिया एसएमई एक्सलन्स पुरस्कारांचे वितरण शनिवारी (दि. 25) मुंबई येथे संपन्न झाले, त्यावेळी ते बोलत होते.
यावेळी लघु आणि मध्यम उद्योजकांच्या ‘इंडिया एसएमई लीडरशिप समिट’ परिषदेला संबोधित करताना राज्यपालांनी कृषी क्षेत्रानंतर सर्वाधिक रोजगाराच्या संधी निर्माण करणारे क्षेत्र लघु आणि मध्यम उद्योग हे असून या उद्योगांच्या माध्यमातून महिला तसेच समाजातील विविध उपेक्षित घटकांच्या हातांना रोजगार मिळत असल्याचे राज्यपाल बैस यांनी सांगितले.
लघु मध्यम उद्योग क्षेत्रातील अर्ध्याहून अधिक उद्योग ग्रामीण भागात असल्यामुळे ग्रामीण भागात समृद्धी आणण्याच्या कार्यात या उद्योगांचे योगदान मोठे आहे. तसेच उद्योगांच्या वाढीसाठी संशोधन आणि विकासाला महत्व असून महाराष्ट्र शासनाने या दृष्टीने अनेक उपाय योजना केल्या असल्याचे राज्यपाल यांनी यावेळी सांगितले.
अमृत महोत्सवी वर्षानिमित्त राज्यातील नाट्यगृहे सुसज्ज करणार – सांस्कृतिक कार्यमंत्री मुनगंटीवार
यावेळी संस्थेचे अध्यक्ष चंद्रकांत साळुंखे यांनी राज्यातील लघु मध्यम उद्योगांच्या वाटचालीचा आढावा घेतला. देशाला 5ट्रिलियन डॉलर अर्थव्यवस्था बनविण्यात लघु मध्यम उद्योग मोठी भूमिका बजावू शकतात, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.