नवी दिल्ली : देशभरात औषध पुरवठा किफायतशीर दराने सुरळीत राहावा यासाठी केंद्र सरकार सक्रीय झाले आहे. नॅशनल फार्मास्युटिकल प्राईसिंग ऍथॉरीटी, औषध नियंत्रक आणि राज्य सरकारनी औषधाचा कच्चा माल, औषधे, किफायतशीर दरामध्ये पुरवली जातील याकडे बारकाईने लक्ष द्यावे असे केंद्र सरकारने सांगितले आहे.
सध्या भारतामध्ये करोना व्हायरसच्या संसर्गामुळे थोडेसे अस्वस्थतेचे वातावरण निर्माण झाले आहे. या परिस्थितीत औषध पुरवठा सुरळीत राहावा, औषधे मिळतील याची खात्री ग्राहकांना व्हावी अशी परिस्थिती निर्माण करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. या परिस्थितीचा कोणी दुरुपयोग करत असेल आणि औषधाची साठेबाजी करीत असेल किंवा कृत्रिम टंचाई निर्माण करीत असेल तर त्या विरुद्ध कडक कारवाई करावी अशा सूचनाही केंद्र सरकारने दिल्या आहेत.
नॅशनल फार्मासिटिकल प्राईसिंग ऑथॅरीटीने सर्व राज्यांच्या मुख्य आणि आरोग्य सचिवांना यासंदर्भात पत्र लिहिले आहे. परिस्थितीकडे बारकाईने लक्ष द्यावे आणि गैरप्रकार होत असतील तर ते रोखावे असे सांगण्यात आले आहे. औषधांच्या किमतीच्या चढ-उताराकडेही लक्ष देण्यास सांगितले आहे. कोणी गरजेपेक्षा जास्त दराने औषधी विकत आहे का याकडे लक्ष द्यावे आणि याबाबत योग्य त्या उपाययोजना करावी असे सांगण्यात आले आहे.
यासंदर्भात ईश्वरा रेड्डी यांच्या नेतृत्वाखाली एक समिती स्थापन करण्यात आली असून ही समिती करोना व्हायरसच्या उद्रेकामुळे निर्माण झालेल्या औषध विषय परिस्थितीकडे बारकाईने लक्ष ठेवून आहे. सध्या भारतामध्ये विविध औषध निर्मितीसाठी कच्चा माल 3 महिन्यांपेक्षा जास्त काळ करू शकेल एवढा साठा आहे. त्यामुळे चिंता करण्याचे कसलेही कारण नाही.
कच्चा माल पुरवणाऱ्या चीन मधील काही कंपन्यातील कामकाज आता सुरू झाले असून मार्चच्या अखेरीपर्यंत परिस्थिती पूर्ववत होण्याची लक्षणे आहेत. मुळात चीनमध्ये आवश्यक तो कच्चामाल उपलब्ध आहे. फक्त वाहतुकीचा प्रश्न काही प्रमाणात कायम आहे. भारताने अगोदरच आवश्यक औषधांची निर्यात रोखली आहे. त्यामुळे भारतामध्ये औषधांचा पुरेसा साठा आहे.