पारगाव, {त्रिभूज शेळके}- नदीपाठोपाठ विंधन विहिरींचे पाणी ही पिण्यास योग्य न राहिल्याने फिल्टर पाण्याला मागणी वाढली असून पाण्याची एक क्रेझ झाली आहे. गावोगावी फिल्टर पाणी विक्रेत्यांचे व्यवसाय तयार झाले आहेत.
एकेकाळी फक्त शहरात पहावयास मिळणारे ब्रँडेड कंपन्यांचे पाण्याचे जार (मोठी बाटली) आता ग्रामीण भागात फिल्टर पाणी विकणाऱ्या गाड्या सर्वत्र पहावयास मिळत आहेत. परंतु अनेक ठिकाणी नियमांची पायमल्ली करून फिल्टर पाणी या गोंडस नावाखाली दौंड तालुक्यात दर्जाहिन पाणी विकून नागरिकांची रोज लाखो रुपयांची फसवणूक होत आहे.
बाटली बंद पाण्याच्या विविध नियमावलीचा ससेमिरा चुकवून या व्यावसायिकांनी नवीन युक्ती अंमलात आणली आहे. हे फिल्टर पाणी विक्रेते टेम्पोमध्ये मोठ मोठ्या पाण्याच्या टाक्या भरून कर्कश हॉर्न वाजवीत गावभर हजारो लिटर फिल्टर पाणी विकत आहेत. उन्हाळ्यात तर त्या टाक्या संपल्यानंतर काही वेळातच पुन्हा भरून आलेल्या असतात. मग इतक्या मोठ्या प्रमाणात फिल्टर झालेले पाणी हे प्रमाणित नियमांमध्ये तयार झालेले असते की त्यालाही सध्या पाण्याची टक्कर दिलेली असते, हा एक संशोधनाचा विषय बनला आहे.
पाण्याचा वास न येण्यासाठी अतिरिक्त मात्रा
पाण्याचा वास न येण्यासाठी व पाण्याची चव वाढण्यासाठी ऍन्टीस्केलेंट हे केमिकल वापरले जाते. त्याची अति प्रमाणात मात्रा झाल्यास तेही शरीरास अपायकारक आहे. त्यामध्ये असलेल्या केमिकलची मात्रा किती प्रमाणात आहे. याची नियमित तपासणी झाली आहे का, तेथील स्वच्छता याकडे अन्न व औषध प्रशासन व आरोग्य विभाग यांनी गांभीर्याने लक्ष देऊन अचानक तपासणीची मोहीम राबविण्याची गरज असल्याचा मतप्रवाह नागरिकांमधून उमटू लागला आहे.
२ हजार कुटुंबाच्या गावात ७ लाखांची विक्री
एखाद्या मोठ्या गावात २ हजार कुटुंब असा विचार केला. त्यातील १५०० कुटुंब रोज जारचे पाणी घेतात. १५ रुपयांप्रमाणे रोजचे २२ ते २५ हजार रुपये व महिन्याला ७ ते ८ लाख रुपयांचे पाणी एक गाव खरेदी करीत आहे. तालुक्याचा आकडा हा काही कोटींच्या घरात आहे. शासनाच्या कोट्यवधींच्या पाण्याच्या योजना गावोगावी चालू आहे. त्यातून तरी पिण्या योग्य पाणी मिळावे ही माफक अपेक्षा नागरिक करीत आहेत. तसेच आरोग्य विभागाने सार्वजनिक पाण्याचे नमुने तपासणी वेळी या हि पाण्याचे नमुने तपासणीसाठी घेतले पाहिजेत अशी ही मागणी नागरिकांमधून होऊ लागली आहे.
दौंड तालुक्यात खासगी फिल्टर पाणी विक्रेते यांच्या पाण्याचे नमुने तपासले जातील. यात दोषी आढळल्यास कडक कारवाई करण्यात येईल. – डॉ. उज्ज्वला जाधव, तालुका आरोग्य अधिकारी, दौंड.