कर्जत/जामखेड -कर्जत-जामखेड मतदारसंघात गेल्या केवळ अडीच वर्षांत दीड हजार किलोमीटरपेक्षा अधिक लांबीचे केवळ पाणंद रस्ते तयार झाले असून, याचा नागरिकांना फायदा होत आहे. एखाद्या मतदारसंघात इतक्या कमी कालावधीत एवढ्या मोठ्या लांबीचे रस्ते तयार होणे, हे कदाचित राज्यातील पहिलेच उदाहरण असावे.
कागदावर रस्ते आणि रस्त्यात अतिक्रमण आणि झुडपे अशी परिस्थिती असताना यात बदल करण्याच्या हेतूने आमदार झाल्यानंतर रोहित पवार यांनी कामाला सुरवात केली. रस्त्यांसोबतच पाणी, शिक्षण, रोजगार असे इतरही अनेक प्रश्न या मतदारसंघात असल्याने त्यावर काम करण्याची मागणी नागरिकांकडून होत होती. लोकांच्या आशा-आकांक्षा आणि अपेक्षा पूर्ण करताना आ. पवार यांनी विविध विकासकामांचा झपाटा सुरू केला. आजवर केवळ निवडणुकीत मते मिळण्यासाठी दिली जाणारी आश्वासने आ. पवार यांनी प्रत्यक्ष कामाच्या माध्यमातून जमिनीवर आणल्याचे दिसते.
रस्त्यांचा प्रश्न हा कर्जत-जामखेड मतदारसंघातील ज्वलंत विषय होता. गेल्या अनेक वर्षांत त्याकडे पूर्णतः दुर्लक्ष झाले होते. त्यामुळे करोना काळातही आ. पवार यांनी या प्रश्नाकडे जातीने लक्ष दिले आणि सन 2020-21मध्ये पालकमंत्री पाणंद रस्ते योजनेंतर्गत जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून, तसेच आघाडी सरकारच्या काळातील मातोश्री पाणंद रस्ते योजनेंतर्गत शेत वहिवाटीचे रस्ते तयार केले. आजवर या रस्त्यांवर केवळ अतिक्रमणे होती, तर काही रस्ते अस्तित्वातही नव्हते. आ. पवार यांनी पाठपुरावा करून मंजूर कामांपैकी कर्जत तालुक्यात 423 आणि जामखेड तालुक्यात 476 पाणंद रस्त्यांचे मातीकाम आणि मुरमीकरण पूर्ण केले. यातून कर्जत तालुक्यात 711.5 किलोमीटर, तर जामखेड तालुक्यात 829 किलोमीटर लांबीचे रस्ते तयार झाले. या रस्त्यांचा शेतकऱ्यांना शेतमालाची वाहतूक करणे, शेतात जाणे, तसेच वाडी-वस्तीवर राहणारे नागरिक, विद्यार्थी, रुग्ण या सर्वांचीच सोय होत आहे.
दुसरीकडे आजवर कधीही एवढ्या मोठ्या प्रमाणात पाणंद रस्त्यांची कामे झालेली नसताना आता या झालेल्या रस्त्यांवरून केवळ धुरळा उडवण्याचे काम विरोधकांकडून होत असल्याचे दिसते. याबाबत आ. पवार यांना विचारले असता, महाविकास आघाडी सरकारच्या काळात मतदारसंघात मोठ्या प्रमाणात पाणंद रस्त्यांसाठी निधी आणला आणि सरकारचा पैसा जपून वापरताना मुरमीकरण व माती कामातूनही रस्त्यांची गुणवत्ता राखता येते, हे दाखवून दिले.
याशिवाय इतरही अनेक कामे सुरु होतील. त्यामुळे नेहमीप्रमाणे लोकांच्या डोळ्यात धूळफेक करण्याचे उद्योग विरोधकांकडून केले जात असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. विशेष म्हणजे राज्यात सर्वात कमी खर्चात उत्तम प्रतीचे रस्ते कर्जत-जामखेडमधील प्रशासनाने करून दाखविले, ही वस्तुस्थिती आहे. परंतु शासन निर्णयात प्रत्यक्ष असलेल्या अटी-शर्तींबाबत आणि झालेल्या कामांवर किती खर्च झाला याची शहानिशा न करता स्थानिक प्रशासनाची पिळवणूक करण्यासाठी विरोधकांकडून राजकारण सुरू आहे.
पब्लिक है, ये सब जानती है!
दरम्यान, मतदारसंघातील अनेक कामे आ. पवार यांनी मंजूर करून आणली. परंतु फक्त श्रेय घेण्यासाठीच सध्याच्या सरकारने या कामांना स्थगिती दिल्याच्या प्रतिक्रिया कार्यकर्ते, पदाधिकारी आणि नागरिकांमधून उमटत आहेत. यावरून काम करणारे कोण आणि कामांना स्थगिती आणणारे कोण, हेही लोकांना माहीत आहे.
यापूर्वीच्या दहा वर्षांत होणे अपेक्षित असलेली रस्त्यांची कामे ही करोना असतानाही केवळ गेल्या अडीच वर्षांतच झाल्याने रस्त्यांवरून सुरू असलेली धूळफेक ही विरोधकांची पोटदुखी आहे. गेली दहा वर्षे काहीही न केलेल्या कामाचा फुगा फुटल्याने नैराश्यातून लोकांची दिशाभूल केली जातेय. परंतु कर्जत-जामखेडकर नागरिक कुठल्याही भूलथापांना बळी पडत नाही, हे अडीच वर्षांपूर्वीच दिसले आहे. त्यामुळे मागील दाराने आलेल्या कुणी कितीही रडारड केली तरी त्याचा उपयोग नाही. सामान्य माणूस आणि मतदारसंघाच्या विकासासाठी मी यापुढेही लढत राहील आणि अधिकाधिक निधी आणण्यासाठी प्रयत्न करत राहील.
– रोहित पवार, आमदार, कर्जत-जामखेड