कोतूळ -ओबीसींच्या जागांवर खऱ्या ओबीसींना न्याय मिळाला पाहिजे. आज जे आरक्षण ओबीसींना दिले आहे, ते आरक्षण टिकवण्याची जबाबदारी आता वाढली आहे. सरकारने आता जनतेतून सरपंच निवडण्याचा निर्णय घेतल्यामुळे आता गावोगावच्या कार्यकर्त्यांनी ओबीसींची मोट बांधावी. ओबीसींनी गावोगावी एकत्र येऊन ओबीसींचे संघटन वाढवावे, असे प्रतिपादन महात्मा फुले समता परिषदेचे राष्ट्रीय उपाध्यक्ष माजी आ. पांडुरंग अभंग यांनी केले
महात्मा फुले समता परिषद व ओबीसी महासंघातर्फे आयोजित संघटनांच्या कार्यकर्त्यांच्या बैठकीत ते बोलत होते. या वेळी समता परिषदेचे प्रकाश कुऱ्हे, बाळासाहेब वडजे, दिलीप मंडलिक, नवनाथ गायकवाड, भास्कर मंडलिक, मच्छिंद्र मंडलिक, सुरेश मंडलिक, भाऊसाहेब गीते, नंदू गीते, बबन तिकांडे, भाऊसाहेब जाधव, प्रफुल्ल ताजने, रावसाहेब नाईकवाडी, मच्छिंद्र भरीतकर, शिवाजी मंडलिक आदी उपस्थित होते.
माजी आ. अभंग म्हणाले की, कुणबी ही जात नसून तो व्यवसाय आहे. ओबीसींचा लढा हा केवळ नेतृत्वावर नसून कार्यकर्त्यांच्या बळावर असतो. नेतृत्व कोणाचे असू द्या. मात्र, नेतृत्वाला कार्यकर्त्यांचे बळ हवे असते. पद्मकांत कुदळे म्हणाले की, ओबीसींची वज्रमूठ बांधण्याची वेळ आली आहे. घटना बदलून आरक्षण संपवण्याचा डाव सुरू आहे, म्हणून आरक्षण वाचण्यासाठी एकजुटीने ओबीसींनी पुढे आले पाहिजे; अन्यथा पुढची पिढी आपल्याला माफ करणार नाही.
छगन भुजबळ यांनी स्वतःच्या राजकारणासाठी नाही, तर ओबीसी आरक्षणासाठी मोठी किंमत मोजल्याचे परिषदेचे विभागीय अध्यक्ष अंबादास गारुडकर यांनी सांगितले. जिल्हाध्यक्ष प्रशांत शिंदे यांनीही ओबीसी संघटनात्मक बांधणीचे आवाहन केले.
या वेळी प्रमोद मंडलिक, बाळासाहेब ताजणे, संतोष मुर्तडक, ज्ञानेश्वर काकड, भाऊसाहेब मंडलिक, बाळासाहेब वाकचौरे, वसंतराव बाळसराफ, किरण चौधरी, के. टी. मंडलिक आदींनी मनोगत व्यक्त केले.