नवी दिल्ली -करोनाबाधितांच्या वाढत्या संख्येमुळे देशात चिंतेचे वातावरण असतानाच एक गुड न्यूज समोर आली आहे. करोनामुक्त झालेल्या देशातील बाधितांच्या संख्येने 2 लाखांचा टप्पा ओलांडला आहे. करोनाचा संसर्ग झालेले रुग्ण बरे होण्याचे देशातील प्रमाण 53.79 टक्के इतक्या समाधानकारक पातळीवर पोहचले आहे.
केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने गुरुवार सकाळपासून 24 तासांतील स्थितीचा आढावा घेऊन आकडेवारी सादर केली. त्यानुसार, देशातील सक्रिय बाधितांपेक्षा करोनामुक्त झालेल्यांची संख्या 40 हजारांपेक्षा अधिक आहे. देशात सध्या 1 लाख 63 हजारांपेक्षा अधिक बाधित आहेत. एकीकडे दिलासादायक चित्र असले तरी दुसरीकडे करोनाबाधितांच्या संख्येतील मोठी वाढ कायम आहे. देशात नवे 13 हजार 586 करोनाबाधित आढळले. तो एकाच दिवसातील नवा उच्चांक ठरला. देशात सलग 8 व्या दिवशी 10 हजारांहून अधिक बाधितांची भर पडली. महाराष्ट्र, तामीळनाडू, दिल्ली, गुजरात आणि उत्तरप्रदेश या 5 राज्यांचा वाटा त्यात मोठा आहे.
देशात सर्वांधिक करोनाबाधित आणि बळींची नोंद महाराष्ट्रात झाली आहे. बाधित संख्येत दुसऱ्या क्रमांकावर असणाऱ्या तामीळनाडूने गुरुवारीच 52 हजारांचा टप्पा ओलांडला. तर दिल्लीतील बाधितांची संख्याही 50 हजारांच्या घरात आहे. गुजरातमध्ये 26 हजारांच्या आसपास बाधित आढळले आहेत. करोना संसर्गाने घेतलेल्या बळींच्या संख्येत दिल्ली देशात दुसऱ्या स्थानी आहे. दिल्लीत सुमारे 2 हजार बाधित दगावले आहेत. तर गुजरातमधील बळींची संख्या 1 हजार 600 च्या घरात पोहचली आहे.