मुंबई – राज्यात लवकरच मेगा भरती सुरू करण्यात येणार आहे. या मेगा भरती अंतर्गत आरोग्य आणि ग्रामविकास विभागात 8 हजार पदापेक्षा जास्त भरती करण्यात येणार आहे, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली. करोना संकटाच्या पार्श्वभूमीवर आरोग्य विभागाला प्राधान्य देण्यात आले असून आरोग्य क्षेत्रातील आवश्यक भरती तातडीने करण्यात येणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
आता आगामी नव्या वर्षात आरोग्य, कायदा आणि सुव्यवस्थेची सुविधा कशा प्रकारे असेल, याबाबत विचारले असता राजेश टोपे म्हणाले, आरोग्य आणि ग्रामविकास विभागातील आरोग्य निगडीत पदं लवकरच भरली जाणार आहेत. राज्य शासनाने भरतीला मान्यता दिली आहे. पुढील दोन महिन्यांत भरती प्रक्रिया राबविण्यात येईल.
सार्वजनिक आरोग्य विभागातील पदभरतीसाठीची प्रक्रिया जानेवारी अखेरपर्यंत पूर्ण करावी. राज्यात करोना रुग्णांची संख्या नियंत्रणात येत असून, सार्वजनिक आरोग्य यंत्रणेने नॉन कोविड रुग्णांच्या सेवेकडे लक्ष द्यावे. सेवेचा दर्जा उंचावतानाच सौजन्यपूर्ण वागणूक सामान्यांना द्यावी. आरोग्य विभागाच्या महत्त्वाच्या योजनांच्या माहितीचा फलक प्रत्येक ग्रामपंचायतीवर लावावा. दिव्यांगांना प्रमाणपत्र देण्याची प्रक्रिया सुलभ करावी, असे त्यांनी सांगितले.
या वर्षात नागरिकांसह आरोग्य यंत्रणा करोनाशी यशस्वी लढा देत आहे. करोना नियंत्रणात असला तरी त्यासाठीचे नियम पाळणे आवश्यक आहे. नवीन वर्ष सर्वांना आरोग्यदायी आणि कोरोनामुक्त जावो, अशा शुभेच्छा आरोग्यमंत्र्यांनी दिल्या.
मोबाइल सर्जिकल युनिट सुरू करावे
नवीन वर्षाच्या पूर्वसंध्येला आरोग्यमंत्र्यांनी ही बैठक घेत यंत्रणेला अधिक सक्षमपणे आणि सेवेचा दर्जा उंचावण्याचे आवाहन केले. करोना काळात सार्वजनिक आरोग्य यंत्रणेचे काम चांगले झाले असून, आता राज्यात करोना स्थिती नियंत्रणात येत असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे जिल्हा आरोग्य यंत्रणेने नॉन कोविड रुग्णसेवेकडे अधिक लक्ष दिले पाहिजे.
अनेक दिवसांपासून मोतीबिंदू शस्त्रक्रिया प्रलंबित आहेत, त्या तातडीने कराव्यात. मोबाइल सर्जिकल युनिट सुरू करावे. तसेच आरोग्यविषयक राष्ट्रीय कार्यक्रम अधिक प्रभावीपणे राबविण्याची गरज असून, राज्य आणि राष्ट्रीय आरोग्य कार्यक्रमांसाठी संनियंत्रणाची प्रणाली विकसित करावी. जेणेकरून प्रत्येक अधिकाऱ्याचे कार्यमूल्यमापन करता येईल, यासाठी संगणक प्रणाली तयार करण्याचे निर्देश आरोग्यमंत्र्यांनी दिले.