मद्यविक्रीची दुकाने राहणार मध्यरात्रीपर्यंत खुली
मुंबई : नाताळ आणि नववर्षाचे जल्लोषात स्वागत करण्यासाठी पहाटे पाच वाजेपर्यंत बार तर मद्यविक्रीची दुकाने मध्यरात्री एक वाजेपर्यंत खुली ठेवण्याची मुभा देण्यात आली आहे. राज्य उत्पादन शुल्क विभागाने त्याबाबत आदेश जारी केले आहेत. पार्टी करणाऱ्यांनी आरोग्यासाठी हानीकारक, अवैध आणि निकृष्ट दर्जाचे मद्य सेवन करू नये. परवानाधारक दुकानातूनच मद्य विकत घ्यावे, असे आवाहनही करण्यात आले आहे.
नाताळनिमित्ताने 24 व 25 डिसेंबर आणि 31 डिसेंबर रोजी मद्यविक्रीची दुकाने रात्री साडेदहाऐवजी मध्यरात्री एक वाजेपर्यंत खुली ठेवण्याची परवानगी सरकारने दिली आहे. तर बार खुले ठेवण्यासाठी मध्यरात्री बारा वाजेपर्यंतची असलेली वेळ पहाटे पाच वाजेपर्यंत वाढविण्यात आली आहे. नाताळ आणि नवीन वर्ष साजरं करण्यासाठी ही सवलत देण्यात आली आहे.
दरम्यान, लोकसभा निवडणुकीपासून ते आतापर्यंत उत्पादन शुल्क विभागाने अनेक ठिकाणे छापे टाकून कारवाई करत तीन कोटी रुपयांहून अधिकचे बनावट मद्य जप्त करण्यात आले आहे. बहुतेक प्रकरणांमध्ये ब्रॅंडेड मद्याच्या नावाने बनावट मद्य विकले जात असल्याचं प्रशासनाच्या नजरेस आलं आहे.