मुंबई – राज्यातील करोना रुग्णांच्या संख्येमध्ये वाढ होताना दिसत नसल्याने राज्य शासनाने शाळा सुरु करण्यास हिरवा कंदील दिला आहे. येत्या ४ ऑक्टोबरपासून करोना नियमांचे पालन करून इयत्ता ५ वी व पुढील वर्ग सुरु करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी या प्रस्तावाला मान्यता दिली.
राज्यातील करोनाचा प्रादुर्भाव कमी होताना दिसत आहे. अॅक्टिव्ह रुग्णांच्या संख्येत सातत्याने घसरण होत असून रुग्ण बरे होणाऱ्यांचे प्रमाण वाढत आहे. यामुळेच शाळा सुरू करण्याच्या संदर्भात निर्णय घेण्यात आला आहे.
करोना प्रतिबंधात्मक सर्व नियम पाळून शाळा सुरू केल्या जाणार आहेत. तसेच संबंधित जिल्हाधिकाऱ्यांना याबाबतचा निर्णय घेण्याचे अधिकार राहतील, असंही शासनाने स्पष्ट केलं आहे. मात्र, गेल्या दीड वर्षापासून बंद असणाऱ्या शाळा सुरु होत असल्यानं विद्यार्थ्यांसाठी, पालकांसाठी आणि शिक्षकांसाठी ही आनंदाची बाब आहे.
त्या त्या जिल्ह्यातील भौगोलिक परिस्थितीचा विचार करता स्थानिक प्रशासन आणि अधिकारी तेथील शाळा सुरू करण्यासंदर्भात योग्य निर्णय घेऊ शकतील, शाळा सुरू करता येतील, असं मत चाइल्ड टास्क फोर्सचे सदस्य डॉ. बकुळ पारेख यांनी व्यक्त केलं होतं.