सातारा जिल्हा आणि विशेषत: वाई तालुका विविध जागृत धार्मिक स्थळांसाठी प्रसिध्द आहे. मांढरदेव येथील श्री काळूबाई असेच एक प्रख्यात आणि जागृत देवस्थान. राज्याच्या कानाकोपऱ्यातून आणि परराज्यातूनही भाविक या देवीच्या दर्शनासाठी येतात. लाखो भाविकांचे श्रध्दास्थान असलेल्या काळूबाईचा वार्षिक उत्सव आज संपन्न होत आहे. त्यानिमित्त या देवीची महती सांगणारा लेख.
सर्व मंगल मांगल्ये
शिवे सर्वार्थ साधिके ।
शरण्य त्र्यंबके
गौरी नारायणी नमोस्तुते ।।
भारतीय संस्कृतीत सगुण भक्तीला अत्यंत महत्वाचे स्थान आहे. आपल्या देवतेची मुर्ती किंवा प्रतिमा यांची पूजा हा सामान्य माणसाच्या मनाला अध्यात्मिक समाधन मिळवून देणारा एक मार्ग आहे. अर्थात हा एकमेव मार्ग नसला तरी सर्वसामान्य माणसाला सध्यातरी त्याशिवाय दुसरा योग्य पर्याय वाटत नाही. भारतीय परंपरेत गणेश, शंकर, विष्णू, सूर्य आणि देवी हे पंचायतन मानले जाते.
या सर्वांमध्ये देवीभक्तांचे स्थान वेगळे आहे. देवीची ही भक्ती आपल्याकडेही मोठ्या प्रमाणावर केली जाते. सातारा जिल्ह्यातील अशी अनेक स्थाने प्रसिध्द आहेत. त्यातील औंधची यमाई, प्रतापगडची भवानी व मांढरदेवची काळुबाई ही प्रमुख स्थाने आहेत. आदिमाया, आदिशक्ती ही सर्व विश्वाची जननी तिची नाना रूपे आपण पाहतो.
दुर्गा, शारदा, सरस्वती, लक्ष्मी, अंबिका, कालिका अशा अनेक रूपांत देवी आहे. मनात कोणतीही अंधश्रध्दा न ठेवता जगात परमेश्वर आहे. अशी भावना ठेवली तर जिच्यापुढे नमावे अशी काहीतरी दिव्यशक्ती आहे. ही श्रध्दा आपल्या मनात निर्माण होऊन आपण विनम्र होतो. मांढरदेव येथे असलेली देवी कालिकामाता आहे, मात्र ही मूर्ती सात्विक स्वरूपाची आहे. ती शस्त्रधारी नाही. या देवीला कालिकामाता या ऐवजी काळुबाई हा अस्सल मराठी शब्द रूढ झाला आहे. देवीची उपासना म्हणजे शक्तीची उपासना.
शक्तीचे प्रतीक असलेला भंडारा तिला प्रिय आहे. शौर्याचे प्रतीक असलेला सिंह हे तिचे वाहन. महिषासूरमर्दिनीने महिषासूराला मारले. याचा तात्विक अर्थ तिने त्याचा शिरच्छेद करून त्याचे शीर आपल्या हातात घेतले आहे. तिच्या भुजांमध्ये असणारी अस्त्रे ही समाजातील दुर्जनांचे निर्दालन करण्यासाठी आहेत. देवीचे सौम्य रूप म्हणजे तिचे अध्यात्म रूप होय. मनुष्याच्या अंगातील काम, क्रोध, मोह, लोभ, मद आणि मत्सर या षङ्रिपूंचे निर्दालन करण्यासाठी या देवीरूपी आदीशक्तीचे प्रकटीकरण केलेले आहे.
समाजातील अज्ञान, अत्याचार तसेच खलप्रवृत्तींचा विनाश करण्यासाठी या शक्तीने चांडिकेचे रूप धारण केले आहे. राजा रत्नासुराचा त्रिकालतज्ज्ञ व युध्दकला तज्ज्ञ सेनापती लाख्यासुराला कोणाही देवाच्या हातून मारणे शक्य नव्हते. तेव्हा मांढरदेव वासिनी काळुबाईने त्याचा नाश केला. अशा अनेक पुराणकथा आपणाला ठाऊक आहेत.
अशा प्रकारे पूर्ण केलेले देवीचे महात्म्य जाणून तिची मनोभावे उपासना करणे आवश्यक आहे. देवीच्या भक्तीमुळे जीवनातील नैराश्य दूर होऊन होकारात्मक आशावाद जागृत होईल. अधिक उत्साहाने आणि आत्मविश्वासाने आपल्या आयुष्याची मार्गक्रमणा करता येईल. आणि आपले जीवनरूपी कमलपुष्प सदैव बहरलेले राहिल.