पिंपरी, दि. 26 (प्रतिनिधी) – राज्यातील सत्ता गेली आहे. त्यामुळे आता यांचे काही खरं नाही, असे म्हणून जर नगरसेवक आढावा बैठकीला येत नसतील तर त्यांना सांगतो गेलेली सत्ता कधीही येऊ शकते. प्रत्येकाचा टाइम कधीही बदलू शकतो, असे म्हणून राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी गैरहजर नगरसेवकांचा चांगलाच समाचार घेतला. तसेच गैरहजर नगरसेवकांचा यादी पाठवा, अशी सूचना पाटील यांनी केली.
राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या उपस्थित काळेवाडीत सभासद नोंदणी आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे. या बैठकीत पाटील बोलत होते. यावेळी शहराध्यक्ष अजित गव्हाणे, माजी आमदार विलास लांडे, महिलांच्या पुणे विभागीय अध्यक्षा वैशाली नागवडे, शहर महिला अध्यक्षा कविता आल्हाट, माजी महापौर संजोग वाघेरे, प्रदेश प्रवक्ते रविकांत वरपे, विद्यार्थी प्रदेशाध्यक्ष सुनील गव्हाणे, कार्याध्यक्ष राहुल भोसले, फजल शेख, पिंपरी विधानसभा अध्यक्ष श्याम लांडे, चिंचवडचे अध्यक्ष विनोद नढे, भोसरीचे पंकज भालेकर, माजी विरोधी पक्षनेते नाना काटे, भाऊसाहेब भोईर, माजी नगरसेविका वैशाली काळभोर, शमीम पठाण, युवक अध्यक्ष इम्रान शेख, युवती अध्यक्षा वर्षा जगताप आदी उपस्थित होते.
आढावा बैठकीला किती नगरसेवक उपस्थित आहेत, अशी विचारणा करून पाटील यांनी नगरसेवकांची हजेरी घेतली. तर बोटांवर मोजण्या एवढे नगरसेवक उपस्थित असल्याने प्रदेशाध्यक्ष पाटील चिडले. ते म्हणाले, राज्यातील सत्ता गेल्यामुळे जर नगरसेवक बैठकांना हजेरी लावत नसतील तर प्रत्येकाचा टाइम कधीबी बदलू शकतो. गेलेली सत्ता कधीही येऊ शकते. त्यामुळे गैरहजर नगरसेवकांना माझा निरोप पोहचवा. त्यांची यादी करून मला पाठवा, अशी सूचना शहराध्यक्ष अजित गव्हाणे यांना केली.
पाटील पुढे म्हणाले, पक्षाच्या सर्व सेलच्या पदाधिकाऱ्यांनी सभासद नोंदणी करणे आवश्यक आहे. विद्यार्थी आघाडीने प्रत्येक महाविद्यालयाच्या बाहेर टेबल टाकून नोंदणी करावी. एका देशमुख नावाच्या पदाधिकाऱ्याशी संवाद साधताना तुम्ही किती सभासद नोंदणी केली, अशी पाटील यांनी विचारणा केली असता संबंधित पदाधिकाऱ्यांने कमी आकडा सांगितला. त्यावर देशमुख, पाटील, पवार, शिंदे आडनावाच्या पदाधिकाऱ्यांनी कमीत-कमी 200 सभासद नोंदणी करावी, अशी टिप्पणी केल्यानंतर उपस्थितांमध्ये एकच हशा पिकला. तसेच नगरसेवकांकडे अनेक नागरिक येत असतात. त्यांनीही कमीत-कमी 300 क्रियाशील सभासद नोंदणी करावी, असेही पाटील म्हणाले.
आता काम करणाऱ्यांच्याच घरी जाणार
आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जो जास्तीत-जास्त सभासद नोंदणी करेल. त्याला निवडणुकीत त्याचा फायदा होईल. त्यामुळे मी पुन्हा येईन असे म्हणत पाटील म्हणाले, जो पदाधिकारी प्रामाणिकपणे काम करेल, त्याच्या घरी आपण शहराध्यक्ष अजित गव्हाणे यांना घेऊन चहा प्यायला येऊ. आता उगाच कुणाच्याही घरी जाणार नाही.