पिंपरी, दि. 26 (प्रतिनिधी) केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत दिल्लीत बैठक आयोजित केली होती. यामध्ये मावळ लोकसभेबाबत चर्चा झाली आहे. कोणत्या पक्षातून आणि चिन्हावरून निवडणूक लढवायची, हे ठरले असल्याचे खासदार श्रीरंग बारणे यांनी पिंपरी येथे झालेल्या पत्रकार परिषदेत सांगितले. त्यामुळे मावळ बाबत होणाऱ्या तर्कवितर्कांना पूर्णविराम द्यावा. निवडणुकीवेळी योग्य ते ठरवू असेही बारणे म्हणाले.
खासदार श्रीरंग बारणे हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटात सामील झाले आहेत. या वेळी पिंपरी-चिंचवड शहरातून त्यांच्यासोबत आलेल्या पदाधिकाऱ्यांसह पत्रकार परिषदेचे त्यांनी आयोजन केले होते. या वेळी ते बोलत होते. या वेळी पिंपरी-चिंचवड, मावळ जिल्हाप्रमुख बाळासाहेब वाल्हेकर, उपजिल्हाप्रमुख शरद हुलावळे, सुनिल हगवणे, दत्ता भेगडे, सुरेश राक्षे, राजेश वाबळे, निलेश बारणे, निलेश हाके, माऊली जगताप, अंकुश कोळेकर, विमल जगताप, जितेंद्र ननावरे, सोमनाथ गुजर, बशीर सुतार, निखिल येवले आदीसह कार्यकर्ते या वेळी उपस्थित होते.
खा. बारणे म्हणाले की, मावळ लोकसभेत भाजपा शिवसेना युतीला लोकांनी मतदान केले. भाजपाच्या नेत्यांनीही प्रामाणिक काम केल्यामुळे माझा विजय झाला. दरम्यानच्या काळात महाविकास आघाडी झाल्याने आम्ही सत्तेत सहभागी झालो. मात्र ही युती योग्य नसल्याचे वारंवार आम्ही बैठकीत सांगितले. त्याची दखल न घेतल्याने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या विचाराने प्रेरित होऊन आम्ही बाहेर पडलो. सध्या ते चांगले काम करत असल्याचे बारणे म्हणाले.
राष्ट्रवादीकडून शिवसेनेचे खच्चीकरण
पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यासोबत असताना राज्यभर दौरे करून शिवसैनिकांच्या भावना जाणून घेतल्या होत्या. राष्ट्रवादीचे पालकमंत्री सहकार्य करत नसल्याची तक्रार शिवसैनिक करत होते. खोट्या गुन्ह्यात अडकविले जात होते. सोलापूर, जालना, गडचिरोली, परभणी येथे दौरा केल्यानंतर तसा अहवाल देऊनही पक्षाने दुर्लक्ष केल्यानेच असा निर्णय घेतल्याचे बारणे यांनी सांगितले.
ठाकरेंवर बोलणे टाळले
उद्धव ठाकरे कार्यकर्त्यांना भेटले नाही. त्यामुळे आमदार नाराज होते का ? तसेच आदित्य ठाकरे यांनी वडगाव मावळ येथे मोर्चा काढत स्थानिक खासदार काय करतात, अशी टीका केली. या बाबत बोलताना बारणे म्हणाले की, उद्धव ठाकरे व आदित्य ठाकरे यांच्यावर बोलणे योग्य होणार नाही. त्यांच्यासाठी प्रवक्ते नेमले आहेत. ते बोलतील असे म्हणत खासदार बारणे यांनी टाळले.