वडगाव मावळ, दि.26 (प्रतिनिधी)-वेदांता-फॉक्सकॉन प्रकरणी शिंदे गट-भाजपच्या वतीने वडगाव मावळमध्ये निषेध मोर्चा काढत ठिय्या आंदोलन करण्यात आले. भाजपा आमदार व प्रवक्ते राम कदम यांच्या प्रमुख उपस्थितीत सोमवारी (दि.26) झालेल्या या आंदोलनात वेदांता- फॉक्सकॉन प्रकल्पाबाबत महाविकास आघाडीने चुकीची माहिती युवकांना देत त्यांची व महाराष्ट्रातील जनतेची दिशाभूल केली, असा आरोप करत केला. त्यामुळे आदित्य ठाकरे यांनी वडगाव मावळ येथे महाराष्ट्रातील जनतेची पुन्हा येऊन माफी मागावी, अशी मागणी केली.
शिवसेना आमदार व युवा सेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी दोन दिवसांपूर्वी वडगाव मावळमध्ये जनआक्रोश आंदोलनात सहभागी होऊन मोर्चा काढला होता. यावेळी त्यांनी सत्ताधाऱ्यांवर चौफेर टीका केली. त्या टीकेला आज भाजपच्या वतीने उत्तर देत ठिय्या आंदोलन करण्यात आले.
यावेळी बोलताना आमदार राम कदम यांनी महाविकास आघाडी तसेच माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व आदित्य ठाकरे यांच्यावर निशाना साधला.जे मुख्यमंत्री मंत्रालयात कधी गेलेच नाही, त्यांनी वेदांता फॉक्सकॉन सोबत करार कधी केला नाही, कोणता एमओयु केला नाही, कोठे जमिनीचे भूसंपादन केले नाही ते हा प्रकल्प राज्याबाहेर गेल्याची ओरड करत जनतेची दिशाभूल करत आहेत असा हल्लाबोला केला. जे स्वतःच्या आमदार व खासदारांना दोन वर्षात भेटले नाही ते कंपनीच्या अधिकाऱ्यांना कधी भेटणार अशा शब्दांत त्यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर टिका केली.
माजी राज्यमंत्री बाळा भेगडे म्हणाले, या प्रकल्पासाठी जागाच संपादित केली गेली नव्हती. शेतकऱ्याला मोबदला दिला गेला नाही. वेदांता- फॉक्सकॉन आणि शासनामध्ये कोणताच करार झाला नव्हता. मग शिल्लक सेनेचे नेते आदित्य ठाकरे मावळ आणि महाराष्ट्रातील जनतेची फसवणूक का करत आहेत? करार झाला असेल तर त्याची प्रत दाखवा,असे खुले आवाहन त्यांनी आदित्य ठाकरे यांना दिले. खासदार श्रीरंग बारणे, माजी मंत्री बाळा भेगडे, रिपाइंचे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष सूर्यकांत वाघमारे, भाजप जिल्हाध्यक्ष गणेश भेगडे, तालुकाध्यक्ष रविंद्र भेगडे, रिपाइं तालुकाध्यक्ष लक्ष्मण भालेराव सहभागी झाले होते.
मावळातील अन्य कंपन्यांचे स्थलांतर कोणामुळे?
महाविकास आघाडीने करार केला असला तर आज तुमच्या आमच्या मुलांवर नोकरीसाठी वणवण फिरायची वेळ आली नसती असा घणाघात राम कदम यांनी केला.मावळातील काही कंपन्या स्थलांतरित झाल्या त्या कोणामुळे झाल्या, याची माहिती आदित्य ठाकरे यांनी घ्यावी, असा सल्ला यावेळी देण्यात आला.