नवी दिल्ली – देशातील काही भागात सध्या चांगला पाऊस झाला आहे. तर काही भागात अद्यापही पावसाची प्रतीक्षा कायम आहे. हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार 1 जूनपासून आत्तापर्यंत देशात सरासरीच्या 91 टक्के पाऊस झाला आहे. दरवर्षी 30 ऑगस्टपर्यंत देशात 687 मिमी सर्वसाधारणपणे पाऊस होत असतो, यावर्षी मात्र प्रत्यक्षात 627 मिमी पावसाची नोंद झाली आहे. महाराष्ट्रासह केरळमध्ये पावसाची मोठी तूट असल्याची माहिती हवामान विभागाने दिली आहे.
देशात सरासरीच्या 9 टक्के पाऊस कमी झाला आहे. केरळमध्ये यावर्षी पावसाची मोठी तूट पाहायला मिळात आहे. जूनपासून केरळात आत्तापर्यंत सरासरीच्या 48 टक्के पावसाची तूट झाली आहे. तसेच मध्य महाराष्ट्रात सरासरीच्या 22 टक्के पावसाची तूट झाल्याचे पाहायला मिळत आहे. मराठवाड्यात देखील 1 जूनपासून सरासरीच्या 19 टक्के पावसाची तूट पाहायला मिळत असल्याची माहिती हवामान विभागाने दिली आहे.
महाराष्ट्रात सरासरीच्या उणे 58 टक्के तूट
ऑगस्ट महिन्याचा विचार केल्यास राज्यात सरासरीच्या उणे 58 टक्के तूट निर्माण झाली आहे. कारण, ऑगस्टमध्ये सरासरीच्या फक्त 42 टक्के पाऊस झाला आहे. सर्वात विदारक परिस्थिती मराठवाड्यात आहे. तिथे सरासरीच्या केवळ 28 टक्के पाऊस झाला आहे. त्याखालोखाल मध्य महाराष्ट्र आणि कोकणात केवळ 36 टक्के पाऊस पडला आहे. राज्यातील 15 जिल्ह्यात पावसाच्या सरासरीतील तूट मोठी आहे. या मोठ्या तुटीमुळे आणि पुढचे काही दिवस पावसाची शक्यता नसल्याने पिण्याच्या पाण्याचा प्रश्न निर्माण होण्याची भीती वर्तवण्यात येत आहे.