रब्बीचे एक, उन्हाळी तीन आवर्तने मिळणार : आ. काळे
कोपरगाव – गोदावरी कालव्यातून रब्बीसाठी एक व उन्हाळी तीन आवर्तने, असे एकूण चार आवर्तने देण्यात येतील, असा निर्णय कालवा सल्लागार समितीच्या बैठकीत घेण्यात आला असून, समितीची बैठक गोदावरी कालव्याच्या लाभक्षेत्रातच घ्या, अशी मागणी केली असता, ती मान्य करण्यात आल्याची माहिती आ. आशुतोष काळे यांनी दिली.
मुंबई येथे कालवा सल्लागार समितीची बैठक अन्न व नागरी पुरवठा, ग्राहक संरक्षणमंत्री छगन भुजबळ यांच्या अध्यक्षतेखाली आज पार पडली. या बैठकीसाठी कालवा सल्लागार समितीचे सदस्य म्हणून आ. काळे उपस्थित होते. यावेळी आ. काळे यांनी गोदावरी कालव्याच्या लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांना येणाऱ्या अडचणींकडे ना. भुजबळ यांचे लक्ष वेधले.
कालवा सल्लागार समितीची बैठक मुंबई येथे मंत्रालयात न घेता लाभक्षेत्रात घेण्यात यावी. तसे झाल्यास लाभधारक शेतकरी बैठकीस उपस्थितीत राहून आपल्या अडचणी मांडू शकतात. त्यावर समितीची बैठक जिल्हास्तरावर घेण्याचे मान्य करण्यात आले. तसेच मागील काही वर्षांपासून पाटबंधारे विभागात अनेक पदे रिक्त आहेत.
त्याचा परिणाम आवर्तन काळात होत असून, रिक्त जागांवर कर्मचाऱ्यांची तातडीने नियुक्ती करावी, कालव्याच्या वितरिका, मुख्य चाऱ्या व पोट चाऱ्यांमध्ये झुडपे वाढल्यामुळे आवर्तनाच्या वेळी अडचणी येऊ नयेत, यासाठी चाऱ्यांची दुरस्ती करण्यात यावी, आवर्तन काळात लाखो लिटर पाणी वाया जाते.
त्यामुळे डाव्या उजव्या कालव्यांच्या भराव्याचे काम करण्यात यावे. पालखेड डाव्या कालव्यातून शिरसगाव, सावळगाव, तिळवणी, आपेगाव, गोधेगाव, घोयेगाव, भोजडे, कासली, पढेगाव, दहेगाव, अंचलगाव, करंजी व उक्कडगाव, तळेगाव मळे आदी गावांना पाणी देण्यात यावे, आदी मागण्या आ. काळे यांनी केल्या. तसेच गोदावरी कालव्यांचे नूतनीकरण करण्यात यावे, अशा आशयाचे निवेदन ना. भुजबळ यांना यावेळी दिले.