संतोष पवार
सातारा – ग्रामपंचायतीच्या व्यवहारात पारदर्शकता राहवी, यासाठी ग्रामपंचायतीमध्ये कोणतीही वस्तू खरेदी करायची असल्यास शासनाच्या गव्हर्नमेंट ई- मार्केटप्लस जीएमच्या पोर्टलवरच खरेदी करण्याबाबत जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी संजय भागवत यांचे लेखी आदेश आहेत. शाहूपुरी ग्रामपंचायतीला मात्र जीएम पोर्टलचे वावडे असल्याचे दिसून येत असून पोर्टल डावलून लाखो रुपयांच्या इलेक्ट्रिक साहित्याची खरेदी ग्रामपंचायतीने केली आहे. याबाबत विरोधी सदस्यांनी तक्रार करुनही त्यावर अद्याप तरी काहीच कारवाई झाली नसल्याने शाहूपुरीत “ऐकावे ते नवलच’ अशा प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत.
शाहूपुरी ग्रामपंचायतीमध्ये भैरवनाथ ग्रमविकास आघाडीची सत्ता आहे. सत्ताधारी 11 आणि विरोधी शाहूपुरी विकास आघाडीचे 6 सदस्य आहेत. सत्ताधारी गट माजी खासदार उदयनराजे भोसले यांचे नेतृत्व मानतात तर विरोधक आ. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांचे नेतृत्व मानतात. उदयनराजे व शिवेंद्रसिंहराजे एकत्र आले. मात्र, शाहूपुरीत दोन्ही आघाड्या मात्र एकत्र येऊ शकल्या नाहीत.
सत्ताधाऱ्यांनी नेहमीच बहुमताच्या जोरावर पंचायत समिती सदस्य संजय पाटील यांच्या नेतृत्वाखाली ग्रामपंचायतीचा कारभार केला आहे. त्यामुळे सत्ताधारी- विरोधक यांच्यात नेहमीच संघर्ष उफाळत राहतो. ग्रामपंचायतीच्या मासिक मिटींगमध्ये, ग्रामसभेमध्ये विरोधी सदस्यांनी मांडलेले मुद्दे विचारात घेतले जात नसल्याची तक्रार आहे.
सत्ताधाऱ्यांनी विकास कामे करतानाही विरोधकांना नेहमीच डावलल्याचा आरोप होत आहे. विकासकामे करताना विरोधी सदस्यांच्या वॉर्डांमध्ये कामे होत नाहीत. अनेकदा आवाज उठवूनही कामे प्रलंबित राहत आहेत. वास्तविक ग्रामपंचायतीने संपूर्ण शाहुपुरीचा विचार करणे गरजेचे आहे. मात्र, तसे होताना दिसत नाही. विरोधी सदस्यांचे वॉर्ड मूलभूत सुविधांपासून वंचित असल्याचे चित्र उघडपणे दिसत आहे. याऊलट सत्ताधाऱ्यांच्या वॉर्डांमध्ये विकासाची गंगा खळाखळा वाहत आहे. हा विरोधाभास शाहूपुरीकरांच्या नजरेतून चुकलेला नाही. विरोधी सदस्यांनी या दुजाभावाबाबत अनेकदा तक्रारी केल्या आहेत.
शाहुपुरी ग्रामपंचायतीची लोकसंख्या सुमारे 40 हजार आहे. या ग्रामपंचायतीला 14 वित्त आयोगातून मोठा निधी मिळत आहे. कररुपातून वार्षिक मोठा महसूल मिळत असल्याने विविध कारणांमुळे ही ग्रामपंचायत नेहमीच चर्चेचा विषय बनली आहे.
ग्रामपंचायतींच्या व्यवहारात पारदर्शकता राहवी, यासाठी शासनाने जीएम पोर्टलच्या माध्यमातून सर्व प्रकारची खरेदी करण्याबाबत लेखी आदेश आहेत. मात्र, हा आदेश डावलून शाहूपुरीत लाखो रुपयांचे इलक्ट्रिक साहित्य खरेदी करण्यात आले. या विषयावरुन सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये जोरदार संघर्ष सुरु आहे.
ग्रामपंचायतीच्या या मनमानी कारभाराविरोधात विरोधी सदस्यांनी मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांकडे लेखी तक्रार केली आहे. मात्र, या तक्रारीवर अद्याप कारवाई झाली नाही. याचदरम्यान लाखो रुपयांचे एलइडी ग्रामपंचायतीने खरेदी करुन शाहूपुरी प्रकाशमय करण्याचा प्रयत्न केला. मात्र, घाईगडबडीत एलइडीचा दर्जा बघितला नसल्याने अनेक भागात अंधाराचे साम्राज्य निर्माण होत आहे. एलइडी खरेदी करताना नियम डावलण्यात आल्याचा आरोप विरोधी सदस्यांमधून होत असून जनतेकडून कररुपाने येणाऱ्या पैशाचा अपव्यय होत असल्याची चर्चा शाहूपुरीकरांमध्ये आहे.
“तुमचा वॉर्ड विरोधात आहे’
ग्रामपंचायतींनी विविध प्रकारची खरेदी शासनाच्या जीएम पोर्टलद्वारे करावी, असे आदेश असतानाही अनेक ग्रामपंचायती बहुमताच्या जोरावर हा आदेश धुडकावत आहेत. हे पोर्टल त्रासदायक आहे, असे सत्ताधारी म्हणत आहे. या पोर्टलमुळे नागरिकांना जलद सेवा मिळत नाहीत, त्यामुळे ग्रामपंचायतींनी थेट लाखो रुपयांच्या खरेदीचा सपाटा लावला आहे. या खरेदी व्यवहारात पारदर्शकता राहील असे वाटत नाही. मात्र शासनाच्या पत्रकाला हरताळ फासण्याच्या प्रकाराबद्दल शाहूपुरी ग्रामपंचायतीच्या विरोधी सदस्यांनी मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांकडे तक्रार केली आहे. त्यामुळे याबाबत ते काय कारवाई करतात, याकडे लक्ष लागून राहिले आहे.
जीएम पोर्टल म्हणे त्रासदायक…
वास्तविक ग्रामपंचायतीचे सरपंच, उपसरपंच हे एका वॉर्डासाठी बांधील नसतात. ग्रामपंचायत हद्दीतील सर्व नागरिकांना मूलभूत सुविधा पुरवणे हे त्यांचे मूळ काम आहे. मात्र, शाहूपुरी ग्रामपंचायतीत वेगळेच चित्र आहे. विरोधी वॉर्डातील प्रलंबित कामे, सोयीसुविधांबाबत नागरिक भेटल्यानंतर त्यांना “तुमचा वॉर्ड विरोधात आहे’ असे सांगण्यात येत आहे. विरोधी सदस्यांच्या वॉर्डातील कामे एक तर लवकर मंजूर केली जात नाहीत. जी कामे मंजूर होतात ती कामे लवकर सुरु केली जात नाहीत. शाहूपुरीकरांच्या भावनांशी खेळण्याचा हा प्रकार असून पदाधिकाऱ्यांनी एका वॉर्डापुरते किंवा सत्ताधाऱ्यांच्याच वॉर्डात कामे करण्यापेक्षा विरोधी वॉर्डात कामे करण्याची गरज आहे. विरोधी वॉर्डात कामे झाली तर निदान पुढच्या निवडणुकीत तो वॉर्ड आपल्या ताब्यात येऊ शकतो, अशी मानसिकता ठेवली तरच विकासाची खरी संकल्पना सत्यात उतरणार आहे.