पुण्यातील वकिलांची मुंबई उच्च न्यायालयात जनहित याचिका
पुणे(प्रतिनिधी) – करोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर निर्माण झालेल्या परिस्थितीत जीवाचा धोका पत्करून नागरिकांच्या संरक्षणासाठी पोलीस कार्य करत आहेत. या पार्श्वभूमीवर पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना पगार वाढ व इतर सुविधा देण्यात याव्यात अशी मागणी करणारी जनहित याचिका पुण्यातील काही वकिलांनी मुबई उच्च न्यायालयात दाखल केली आहे.
घटनेच्या अनुच्छेद २२६ अन्वये अॅड. तौसिफ शेख आणि अॅड. सतीश गायकवाड यांच्या वतीने अॅड. गणेश गुप्ता, अॅड. क्रांती सहाणे, अॅड. स्वप्निल गिरमे, अॅड. सूरज जाधव, अॅड. कादर मिलवाला, अॅड. ब्रिजेश कुमार यांनी ही जनहित याचिका दाखल केली आहे.
करोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता शासनाने नागरिकांना घरात राहण्याचे आवाहन केले आहे. करोनाचा प्रादुर्भाव वाढत असला तरी नागरिकांच्या सुरक्षितते साठी पोलीस कर्मचारी, अधिकारी अहोरात्र झटत आहे. महाराष्ट्र सरकारने १ एप्रिल २०२० रोजी परिपत्रक काडून सर्व सरकारी कर्मचाऱ्यांचा पगार दोन टप्यात अदा करण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार पोलिसांचा पगारही दोन टप्प्यात अदा केला जाणार आहे. शासनाने हे जीआर रद्द कारवा व पोलीस कर्मचार्यांना, बोनसच्या स्वरूपात प्रोत्साहन, अतिरिक्त वेतन, पीपीई (वैयक्तिक संरक्षण उपकरणे) किट उपलब्ध करून द्यावे, जेणे करून पोलिसांचा मनोबल वाढेल, अशी मागणी या याचिकेद्वारे करण्यात आली आहे.