टाकवे बुद्रुक, (वार्ताहर) – लोकसभा निवडणुक मतदानाची तारीख जशी जवळ येत आहे तशी मावळ तालुक्यातील प्रचारात रंगत येत आहे. निवडणुकीच्या कालावधीत मावळ तालुक्यात यात्रांचा हंगाम सुरू झाल्याने मांसाहारी जेवणावळी करत गावोगावी राजकीय गप्पांचे फड रंगत आहेत. गावागावांच्या यात्रेत ‘इलेक्शन फिवर’ दिसून येत आहे.
फेब्रुवारी महिन्यापासून गावोगावच्या यात्रांना सुरूवात होते. मे महिन्यांपर्यंत या यात्रा सुरू असतात. या चार महिन्यांत यात्रांचा हंगाम असतो. गावोगावी पहिल्या दिवशीचा छबिना पालखी झाली, की दुसऱ्या दिवशी मांसाहारी पंगती उठत आहेत. याच काळात निवडणुका होणार असल्याने यात्रांमध्ये निवडणुकांची चर्चा रंगत असल्याचे दिसून येते. मित्रमंडळी जेवणासाठी आली आहेत की निवडणुकीच्या प्रचाराची बैठक घेण्यासाठी हेच समजेनासे झाले आहे.
काही ठिकाणी दोन पक्षांचे पाहुणे, मित्रमंडळी एकत्र आले तर चर्चा ऐकण्यासारखी असते. या चर्चेत अनेक आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडत असल्याचे चित्र दिसते. दरम्यान, मावळ लोकसभा निवडणुकीसाठी महायुती आणि महाआघाडीचे उमेदवार जाहीर झाले असल्याने ते देखील गावोगावींच्या यात्रेला हजेरी लावत असून नागरिकांशी संवाद साधत आहेत.
या निवडणुकीत कोणी कशी बाजी मारेल, कोणाचा टांगा पलटी होणार, याबाबत दावे-प्रतिदावे करण्यात येत आहेत. त्यामुळे शहरासह ग्रामीण भागातही ‘इलेक्शन फिवर’ दिसून येत आहे.
यात्रा, लग्न समारंभात नेतेमंडळींचा राबता लोकसभा निवडणुका जाहीर होताच यात्रा व लग्न समारंभात विविध राजकीय पक्षांच्या नेतेमंडळींची वाढती हजेरी चर्चेची ठरत आहे. गेल्या काही वर्षांत आपल्या गावाकडे पाठ फिरविलेला नेता निवडणुका जाहीर होताच अचानक सारखा येत असल्याने अनेक नागरिक नकारात्मक चर्चा करीत आहेत; परंतु निवडणुकांमुळे मागील काही दिवसांत यात्रा, लग्न, वाढदिवसांना पुढाऱ्यांची हजेरी वाढली आहे हे नक्की.
अनेक गावांत यात्रा शांततेत
लोकसभा निवडणुका व यात्रांचा हंगाम एकत्रच आला आहे. निवडणुकांच्या काळात परवानगी घेऊन सांस्कृतिक कार्यक्रम करता येत आहेत. तमाशा, बैलगाडीच्या शर्यती, कुस्ती यासह विविध कार्यक्रमांवर बंदी नसली तरी निवडणूक आचारसंहितेचे कारण देत रात्री दहा वाजताच कार्यक्रम बंद करण्यास पोलीस सांगत आहेत.
निवडणुकीच्या काळात कार्यक्रमांमध्ये एखादा अनुचित प्रकार घडल्यास जबाबदार यात्रा कमिटी अथवा परवानगी घेणाऱ्यांना धरले जाणार आहे. त्यामुळे यंदा गावांमध्ये जबाबदारी घेऊन काम करण्यास कोणी उत्सुक नसल्याने गावोगावच्या यात्रा शांततेत सुरू आहेत.