पुणे, {प्रभात वृत्तसेवा}- जगातील अनेक राष्ट्रांत विद्यार्थ्यांना गृहपाठ दिला जात नाही. आपणही हे धोरण स्वीकारण्याची गरज आहे. शिक्षकांनी विद्यार्थ्यांना गृहपाठ देण्याऐवजी शाळेतच अभ्यास करून घ्यावा आणि क्षेत्र भेट, ऐतिहासिक स्थळ, गडकिल्ले, नदी, वारसा स्थळ, तसेच उद्यानांना भेटीचे उपक्रम राबवून त्यांच्या सर्वांगीण प्रगतीस हातभार लावावा, असे आवाहन राज्यपाल रमेश बैस यांनी केले.
वेध प्रोफेशनल लर्निंग कम्युनिटीद्वारा लोणावळा येथे अयोजित शिक्षक संमेलनाच्या कार्यक्रमात ते बोलत होते. कार्यक्रमाला मिशन मनरेगाचे व्यवस्थापक नंद कुमार, शालेय शिक्षण विभागाचे प्रधान सचिव रणजीतसिंह देओल, वेधचे समन्वयक निलेश घुगे आदी उपस्थित होते.
समूहामध्ये विद्यार्थ्याच्या विचारशक्तीचा विस्तार होतो. त्यांच्यात एकत्रितपणे पुढे जाण्याची भावना निर्माण होते. खेळात सहभाग वाढल्याने विजय आणि पराभव सहजतेने पचविण्याची क्षमता निर्माण होते. मुलांना मोबाईल आणि इलेक्ट्रॉनिक उपकरणांपासून दूर ठेवण्यासाठीदेखील प्रयत्न करावे लागतील. त्यांच्यात नव्या गोष्टींविषयी उत्सुकता निर्माण व्हावी म्हणून त्यांना प्रश्न विचारण्यासाठी प्रोत्साहित करावे लागेल, असे मत रमेश बैस यांनी व्यक्त केले.
देशाच्या विकासात शिक्षणाचे महत्त्वाचे योगदान असल्याने शिक्षकांनी आपल्या राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाचा बारकाईने अभ्यास करण्याची गरज आहे. देशाच्या आत्मनिर्भरतेसाठी विद्यार्थी सक्षम होणे गरजेचे असून, २१ व्या शतकात आवश्यक कौशल्य संपादन करावे म्हणून वर्गाच्या आत आणि बाहेरच्या शैक्षणिक प्रक्रियेत बदल घडवून आणावे लागतील.
शिक्षणात तंत्रज्ञानाच्या समावेशाने विद्यार्थ्यांचे ज्ञान अद्ययावत करून त्यांच्यात आत्मविश्वास निर्माण करावा, असे आवाहन रमेश बैस यांनी केले. शिक्षकांनी केवळ शासनातर्फे आयोजित प्रशिक्षणावर अवलंबून न राहता प्रोफेशनल कम्युनिटी लर्निंगद्वारे एकमेकांशी जोडले जावे. याद्वारे आपल्या अडचणी दूर करण्यासोबत शैक्षणिक प्रक्रियेबाबत अद्ययावत रहाणे शक्य होईल, असेही रमेश बैस यांनी सांगितले.
शिक्षकांची भूमिका महत्त्वाची
शाळेत विद्यार्थ्यांची गुणवत्ता सुधारण्यासाठी शिक्षकांची महत्त्वाची भूमिका असते. शिक्षकांनी विद्यार्थांना शिक्षण देण्याबरोबरच त्यांना प्रोत्साहित करावे. सर्वेक्षणातून असे दिसून आले आहे, की पटसंख्या कमी असलेल्या शाळेत मुले अधिक असलेल्या शाळेपेक्षा विद्यार्थ्यांची प्रगती कमी आहे.
म्हणजेच मुले समूहात राहून अधिक चांगल्या प्रकारे शिकतात. विद्यार्थ्यांनी स्वतःच शिक्षण घ्यावे, यासाठी शिक्षकांनी प्रयत्न करावेत, असे शालेय शिक्षण विभागाचे प्रधान सचिव रणजीतसिंह देओल यांनी स्पष्ट केले आहे.