पुणे, {प्रभात वृत्तसेवा} : उनाच्या वाढत्या झळांमुळे पुणे विभागात अनेक भागात पाणीटंचाई निर्माण झाली आहे. परिणामी, फळभाज्यांचे उत्पादन कमी झाले आहे. मार्केट यार्डात भाजीपाला विभागातील फळभाज्यांची आवक घटली आहे. त्यामुळे काकडी, कोबी, सिमला मिरची आणि घेवड्याच्या भावात वाढ झाली आहे, तर फक्त शेवग्याच्या भावात मात्र घट झाली आहे. मागणी आणि पुरवठा यातील समतोलामुळे उर्वरित फळभाज्यांचे भाव गेल्या आठवड्याच्या तुलनेत स्थिर आहेत.
गुलटेकडी मार्केट यार्डमध्ये रविवारी (दि. १०) राज्याच्या विविध भागांसह परराज्यांतून सुमारे ९० ट्रक इतकी फळभाज्यांची आवक झाली. परराज्यांतून झालेल्या आवकमध्ये कर्नाटक, गुजरात व आंध्र प्रदेश येथून हिरवी मिरची सुमारे १० ते १२ टेम्पो, गुजरात आणि कर्नाटक येथून कोबी ३ ते ४ टेम्पो, आंध्रप्रदेश,
तमिळनाडू येथून ४ ते ५ टेम्पो शेवगा, राजस्थान येथून ७ ते ८ टेम्पो गाजर, कर्नाटक येथून घेवडा ३ ते ४ टेम्पो, राजस्थान आणि मध्य प्रदेशातून ४ ते ५ ट्रक मटार, कर्नाटक येथून ३ ते ४ टेम्पो पावटा, मध्य प्रदेश येथून लसूण सुमारे १२ ते १३ टेम्पो, कर्नाटक येथून तोतापुरी कैरी ३०० बॉक्स इतकी आवक झाली होती.
स्थानिक भागातून झालेल्या आवकमध्ये सातारी आले सुमारे ५०० ते ६०० गोणी, भेंडी ५ ते ६ टेम्पो, गवार ५ ते ६ टेम्पो, टोमॅटो सुमारे ८ ते ९ हजार पेटी, हिरवी मिरची ३ ते ४ टेम्पो, काकडी ७ ते ८ टेम्पो, फ्लॉवर १० ते १२ टेम्पो, कोबी ४ ते ५ टेम्पो, सिमला मिरची ८ ते १० टेम्पो,
पावटा ४ ते ५ टेम्पो, तांबडा भोपळा १० ते १२ टेम्पो, शेवगा ३ ते ४ टेम्पो, घेवडा ४ ते ५ टेम्पो, कांदा सुमारे १५० ट्रक, इंदूर, आग्रा, स्थानिक भागातून बटाटा ३० टेम्पो इतकी आवक झाली होती, अशी माहिती मार्केट यार्ड येथील ज्येष्ठ अडतदार विलास भुजबळ यांनी दिली.