पुणे, {प्रभात वृत्तसेवा}- बालकांच्या मोफत व सक्तीच्या शिक्षण हक्क कायद्याअंतर्गत (आरटीई) प्रवेश प्रक्रिया सुरू झाली आहे. आधी शाळा नोंदणीची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. या प्रक्रियेत मराठा आरक्षणाची अंमलबजावणी करण्याबाबत शिक्षण विभागाने शासनाकडून मार्गदर्शन मागविलेले आहे.
आरटीई अंतर्गत २५ टक्के प्रवेश पात्र शाळांनी आपल्या शाळेची आवश्यक सर्व माहिती अचूक व वस्तुनिष्ठ असल्याची खात्री करूनच संकेतस्थळावर अद्ययावत करावी द्यावी लागणार आहे. शाळा नोंदणीसाठी येत्या दि. १८ मार्चपर्यंत मुदत देण्यात आली असून, शाळांची नोंदणी झाल्यानंतर विद्यार्थ्यांचे प्रवेश अर्ज स्वीकारण्याची प्रक्रिया सुरू होणार आहे. पालकांनी आपल्या मुला-मुलींच्या आरटीई प्रवेशास आवश्यक असणारी कागदपत्र काढून ठेवावी लागणार आहेत.
राज्यातील सुमारे ९० हजार विद्यार्थ्यांना दरवर्षी आरटीई अंतर्गत प्रवेश दिला जातो. आरटीई कायद्यात बदल करण्यात आल्यामुळे राज्यातील तब्बल ९० हजारांहून अधिक शाळांची नोंदी करावी लागणार आहे.
यंदा सरकारी किंवा अनुदानित शाळेच्या एक किलोमीटर परिसरात इंग्रजी माध्यमाची शाळा असेल तर संबंधित शाळेत प्रवेश दिला जाणार नाही, असा बदल राज्य शासनाकडून करण्यात आला आहे. यामुळे केवळ इंग्रजी माध्यमाच्या शाळांचा नाही तर कायद्यातील बदलामुळे इतरही शाळा आरटीईच्या कार्यकक्षेत आल्या आहेत. त्यामुळे प्रवेश क्षमतेत वाढ होईल, असा दावा शिक्षण विभागाकडून केला जात आहे.
शिक्षण विभागाने२०२४-२५ या शैक्षणिक वर्षांची आरटीई प्रवेश प्रक्रिया उशीरा सुरू केली आहे. शाळा नोंदणी व ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया राबवून प्रत्यक्ष प्रवेश देण्याच्या प्रक्रियेला विलंब होणार आहे.