बारामती – शिवसेना उद्धव ठाकरे गट आणि राष्ट्रवादी एकत्रित करून त्यांना खंजीर चिन्ह दिले पाहिजे होते. मशाल आता रुजवायला वेळ लागेल, पण खंजीर म्हटलं तर लोकांच्या लक्षात येईल, अशी टीका आमदार गोपीचंद पडळकर यांनी केली. बारामती येथे पत्रकारांशी बोलताना पडळकर यांनी राष्ट्रवादी आणि शिवसेना ठाकरे गटाचा खरपूस समाचार केला.
पडळकर म्हणाले,राष्ट्रवादीच्या नादाला जो, जो लागेल, त्याची राख होते. आता शिवसेनेत झाली आहे. राज्यामध्ये कर्मचारी आणि असंघटित कर्मचारी यांची संख्या कोट्यवधींच्या घरात आहे. या कर्मचाऱ्यांना न्याय मिळवून देण्याची भूमिका घेऊन काही लोकांनी अनेक संघटना केल्या. कर्मचाऱ्यांना न्याय न देता कर्मचाऱ्यांचा फक्त आणि फक्त राजकारणासाठी वापर करून घेतला.
शरद पवार यांच्या नेतृत्वाखाली संघटना काम करीत होत्या. पंरतु त्यांना न्याय मिळाला नाही. कर्मचाऱ्यांच्या आग्रहाखातर सेवाशक्ती संघर्ष एसटी कर्मचारी ही संघटना उभी केली आहे. एसटी कर्मचाऱ्यांना सातवा वेतनाप्रमाणे पगार मिळाला पाहिजे. एसटी कर्मचाऱ्यांचा मुद्दा सरकारकडे लावून धरणार आहे.
राष्ट्रीय समाज पक्षाचे प्रमुख महादेव जानकर हे बारामती लोकसभा निवडणूक लढविणार असल्याची घोषणा रासप पदाधिकाऱ्यांनी केली आहे. याबाबत ते म्हणाले, ते एका पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आहेत. “रासप’ हा भाजपाबरोबर आहे. घटक पक्षाबाबत निर्णय सांगू शकेल, एवढा मोठा मी नेता नाही. महादेव जानकर आणि देवेंद्र फडणवीस हे सगळे एकत्रित बसून त्याचा निर्णय घेतील. यावेळी भाजप भटके विमुक्त आघाडीचे पश्चिम महाराष्ट्र सरचिटणीस गजानन वाकसे, भाजप जिल्हा उपाध्यक्ष गोविंद देवकाते आदी उपस्थित होते.